Wednesday, February 17, 2010

केली मी आत्महत्या


भेकड म्हणेल कुणी मला
मुर्ख किंवा बेजबाबदार सुद्धा
पण भिती उरली नाही आता कुणाची
हो, केली मी आत्महत्या ।।

रडताहेत बघा आता कसे
ते घरचे अन् शेजारचे
पण कधी दोन मार्क कमी मिळाले
तर अक्षरशः लचके तोडायचे.
शाळा, कॉलेज, क्लास, CET
चा घोळ कधी संपलाच नाही
स्पर्धेचा चक्रव्युह अभिमन्युलासुद्धा
भेदता आलाच नाही ॥

म्हणे बालपण निरागस असतं
आपल्याला कुठे ठाऊक होतं
साला अर्धा वेळ शाळा
अन उर्लेला वेळ homework खातं.
पप्पा म्हणायचे, दादाला बघ
कसा engineer  झाला मोठा
95 टक्क्यांहून कमी मिळाले
तर पाठीत ठरलेला रट्टा.
प्रत्येक पायरी चढता चढता
स्पर्धा सुद्धा वाढत गेली
एकएका गुणासाठी मारामार
ही काय साली जिंदगी झाली?
निघालो होतो कुठल्या दिशेने
प्रवाहाने आणून फेकलं कुठे
उमज आली खूप उशीरा
आता मागे फिरणं नव्हे ।।

मग उचललं एक दिवस rat-kill
किंचित थरथरला हात
घडू दे चंगली अद्दल म्हणून
गिळलं एका झटक्यात.
आठवण आली फक्त आईची
जिचा तुटायचा माझ्यासाठी जीव
माझ्या आकांक्षा, स्वप्नांची
फक्त तिलाच होती जाणीव.
विचलीत झालं माझं मन
तिच्यासाठी क्षणात त्या
पण मेलो होतो कधीच मी 
फक्त आज केली आत्महत्या ॥ 

-तन्वी देशपांडे 

Tuesday, February 16, 2010

आझाद मैदानावरील धरणे

दोन वाजताची वेळ ठरलेली होती. मी, सचिन, गणेश अन संजय धावपळ करतच आझाद मैदानावर सव्वादोनच्या सुमारास पोहचलो, आम्हाला वाटलं उशीर झालाय आणि कदाचित कार्यक्रम सुरूही झाला असेल. निर्माणसह रेशनिंग कृती समिती, स्त्री मुक्ती संघटना, महिला मंडळ फेडरेशन, महाराष्ट्र महिला परिषद या सारख्या महाराष्ट्रातील २८ संघटना आझाद मैदानावर शासनाच्या धान्यापासून दारू बनवण्याच्या धोरणा विरोधात महात्मा गांधी पुण्यतिथी दिवशी धरणे धरणार होत्या. आत्तापर्यंत अमुक संघटनेने, अमुक ठिकाणी, काही मागण्यांसाठी किवा विरोध दर्शवण्यासाठी धरणे धरले, मोर्चा काढला वगैरे गोष्टी मी फक्त वर्तमानपत्रातून वाचत ऐकत आलो होतो. आज मात्र प्रत्यक्ष मी हे सगळं अनुभवणार होतो. आम्हाला पोहचायला उशीर होण्यााचं कारण सकाळपासून आम्ही वाशीच्या ऑफिसमध्ये धरण्यासाठी लागणारी पोस्टर्स बनवत होतो. तर सचिन मुख्यमंत्र्यांना द्यावयाच्या निवेदनावर शेवटचा हात फिरवत होता. आम्ही चौघांनी ऑफिसात नुसता गोंधळ घातला. पोस्टर बनवायला पेपर आहे, तर स्केच पेन नाही प्रिंटर बिघडलाय, पेनड्राईव चालत नाहीये, अशा अडथल्याना पार करत पाच-सहा पोस्टर्स बनवली.

आझाद मैदानावर पोहचलो तेव्हा आम्ही चौघे सोडून आणखी फक्त चार-पाच जणं जमली होती अन कार्यक्रम सुरुच काय पण आणखी काही तयारीही झाली नव्हती, माझा खरंतर मूड ऑफ झाला. आझाद मैदानावर एक दुसराच कार्यक्रम चालू होता त्यासाठी बरीच जनता आली होती. त्यामुळे आम्ही एका कोप-यात जाऊन थाबलो. हळूहळू एक एक जण येत होता. मागे झालेल्या धान्यापासून दारू विरोधी परिषदेमुळे बरेच चेहरे ओळखीचे वाटत होते. ब-याचजणांनी पोस्टर्स आणली होती. मग आम्ही ती भिंतीवर लावण्यालस सुरुवात केली. एकीकडे माइक व स्पीकर्सची व्यवस्था होत होती. तीन वाजेपर्यंत ३००-३५० जनता जमा झाली. बहुतांशी महिला होत्या. आम्ही पन्नास एक पुरुष मंडळी असू. माईकची व्यवस्था झाल्यावर चळवळीतील गाणी व दारू विरोधात घोषणा सुरु झाल्या. आता जरा काहीतरी घडते आहे असा वाटू लागलं. गणेश व सुनील ने "सांग सांग भोलानाथ दारू मिळेल का?" हे गाण म्हटलं. त्यानंतर गोरक्षभाऊनी आपण इथे का जमलो आहोत याची सर्वांना कल्पना दिली. या धरण्यामधे सहभागी असलेल्या विविध संघटनांनी मागील काही दिवसात धान्यापासून दारू विरोधात स्वाक्षरी व पोस्टकार्ड मोहिमा राबवल्या होत्या. त्यात निर्माणच्या वतीने आम्हीही वाशी व ठाणे इथे अशाप्रकारचे काम केले होते. तर या सर्व स्वाक्ष-या व धान्यापासून दारूविरोधी अभियानाच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना द्यावयाचे असे धरण्याचे स्वरूप ठरले.

जेव्हा एखादी संघटना आझाद मैदानावर काही मागण्या घेवून धरणे धरते किंवा मोर्चा काढते, तेव्हा तेथे उपस्थित असणा-या पोलीस अधिका-यांची ही जबाबदारी असते की त्यांनी मंत्रालयातील संबंधित मंत्र्यांशी किंवा अधिका-यांशी संपर्क साधून जनतेच्या मागण्या/मते त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात. जर आपणास त्या संबधित मंत्र्यांची/अधिका-यांची भेट हवी असेल तर तशी व्यवस्था होऊ शकते. अर्थात या गोष्टी मला माहीत नव्हत्या. या आधी कितीदातरी मी या मैदानासमोरून गेलो असेन पण या गोष्टीची मला कल्पना नव्हती.

आता घोषणा व भाषणे यांमुळे धरण्याचा रंग चढू लागला होता. उल्काताई तर खूप छान बोलल्या. सुरेशकाकांनी आपल्या मागण्या म्हणजे मुख्यमंत्र्यांची भेट घेणे व त्यांना २३००० सह्या असणारे मागण्यांचे निवेदन देणे पोलिसांसमोर ठेवल्या. अर्थात त्यांनी काही फारसे लक्ष दिले नाही. एकीकडे घोषणा चालू होत्याच. संध्याकाळी पाच वाजून गेल्यानंतरही काहीच होत नाहीये असे दिसल्यावर आम्ही पोलिसांना इशारा दिला की जर आम्हाला थोड्यावेळात भेट मिळाली नाही तर जमलेले सर्व चारशे लोक मंत्रालयात जाऊन स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. यावरही पोलिसांनी चालढकलपणा व दूर्लक्ष केलं. मग आम्ही मंत्रालयात सत्याग्रहाच्या मार्गाने जाण्याचे ठरवले व दोन-दोनच्या रांगा करून, हातात पोस्टर्स घेवून आझाद मैदानाच्या गेटकडे जाण्यास सज्ज झालो. आम्ही उत्साही तरुण पुढच्या रांगेत जाऊन उभा राहिलो, तेव्हा भारतीताईनी काही महिलांना पुढे उभे केले.

समोर महात्मा गांधींचा फोटो घेवून दोन महिला होत्या. त्यांच्या मागे दोन-दोनच्या रांगा करून आम्ही सर्वजण आझाद मैदानाच्या गेटकडे निघालो. हा आमचा पवित्रा पाहून पोलिसांमधेही हालचाल दिसू लागली. आता पोलिसांची संख्या वाढलेली होती, जवळपास ५०-६० पोलीस आझाद मैदानाच्या गेट वर आम्हाला अडवण्यासाठी जमा झाले होते. मागे पाच-सहा पोलीस व्हॅानही होत्या. बहुदा अटक करावी लागलीच तर कामी येतील असा त्यांजचा विचार असावा. आम्ही गेटकडे चालू लागलो, सर्वांनाच पुढे काय होणार याची उत्सुकता होती अन थोडी भीतीही वाटत होती. पोलीस, मोर्चा, धरणे या अश्या गोष्टी मी तरी पहिल्यांदाच अनुभवत होतो, आपण काहीतरी वेगळं अनुभवतोय असा वाटत होतं. आम्ही सगळे गेटला भिडलो व पोलिसांनी बंद केलेले गेट उघडण्याचा प्रयत्न करत होतो. तर ते आम्हाला मागे रेटत होते. सगळे आझादमैदान घोषणांनी भरून गेले होते. - "बडी शरम कि बात है पुलिसभी उनके साथ है" अन "एक रुपयाचा कडीपत्ता, मुख्यमंत्री बेपत्ता".

काही वेळातच वातावरण चांगलेच तापले, पोलीस अन कार्यकर्त्यांमध्ये रेटारेटी सुरु झाली. पाच-सहा पोलीस गोरक्षभाऊंना घेरून त्यांच्याशी बाचाबाची करू लागले. त्यांच्यावर उगारलेली काठी सुनीलने हातात पकडून ठेवली. मग पोलिसांनी सुनीलला बाहेर काढले अन गाडीत टाकले. आता मात्र सगळाच जमाव उसळला व घोषणांचा जोरही वाढला. मला त्या क्षणाला एक गोष्ट जाणवली की आपणच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी व त्यांच्यासमोर आपल्या मागण्या ठेवण्यासाठी जर एवढा संघर्ष करावा लागत असेल तर गांधींना 'इंग्रजांनो देश सोडा' असे म्हणतांना किती संघर्ष करावा लागला असेल. एका क्षणासाठी त्या कल्पनेने मी थरारून गेलो. बाहेर एवढा गोंधळ चालू असतानाही त्या क्षणासाठी अंतर्मुख झालो. नाहीतर आजपर्यंत सत्याग्रह, मोर्चा, आंदोलने हे शब्द नुसते वाचत किंवा ऐकत आलो होतो, त्याचा थोडा थोडा अर्थ आता कळतोय अस वाटू लागल. चांगल्या गोष्टींसाठी असा हा संघर्ष करणार्यांबद्दल आदर वाटू लागला अन मी नकळत ते गेट जोराने ढकलू लागलो.

साडेसहाच्या सुमारास पोलिसांनी, मुख्यमंत्री तर नाही पण गृहमंत्रालयातील सचिव श्री संगीतराव भेट घेण्यासाठी तयार आहेत असे सांगितले व तुमच्यापैकी कोणीही एकजण भेटू शकता असा निरोप पोलिसांनी आम्हाला सांगितला. पण आम्ही कमीतकमी पाचजणांचे शिष्टमंडळ त्यांना भेटेल या मुद्यावर अडून राहिलो. थोड्याच वेळात तीही परवानगी मिळाली. मुख्यमंत्री मुंबईमध्ये नाहीत तेव्हा संगीतरावना भेटा. ते तुमचे म्हणणे मुख्यमंत्र्यांसमोर मांडतील असे सांगण्यात आले. सचिन, सुरेशकाका अन् आणखी तीघे असे पाचजण सचिवांना भेटण्यास पोलिसांच्या गाडीतून गेले. आम्ही सगळे परत मैदानात येऊन बसलो. तासाभराने शिष्टमंडळ पोलिसांच्याच गाडीतून परत आझाद मैदानावर आले. सचिवांनी निवेदन स्वीकारले होते व ते मुख्यमंत्र्यांना सादर करणार होते. सचिन म्हणाला की “सचिवांनी आम्हाला विशेष काही बोलू दिले नाही, तुम्हीच पुन्हा या विरोधाचा नीट विचार करा या विषयीचा तुमचा अभ्यास नाही” अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली.

एक गोष्ट तर स्पष्ट झाली की एवढ्या सहजासहजी आपले ध्येय साध्य होणार नाहीये, ही तर सुरवात आहे ...आगे आगे देखते है होता है क्या?
 
- त्रिशूल कुलकर्णी

Friday, January 29, 2010

सांग सांग भोलानाथ

सांग सांग भोलानाथ l दारु मिळेल काय ?


शेतामध्ये ज्वारी लावून दारु निघेल काय ? ll धृ ll

भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय

दारु बाटली घेताना आवाज होईल काय

भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ

दारु मिळेल काय ll १ ll

भोलानाथ ! भोलानाथ !! खर सांग एकदा

ज्वारीचे पिक येइल कारे तीनदा

भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ

दारु निघेल काय ll २ ll

भोलानाथ ! उद्या आहें मंत्र्याची बैठक

त्यात माझ्या ज्वारिला मिळेल का रे अनुमोदक

भोलानाथ ! भोलानाथ !! सांग सांग भोलानाथ

दारु निघेल काय ll ३ ll

सांग सांग भोलानाथ l दारु मिळेल काय ?

शेतामध्ये ज्वारी लावून दारु निघेल काय ? ll धृ ll

-अनामिक

Monday, January 18, 2010

कुमार निर्माण निमित्त


कुमार निर्माणचे गडचिरोली मधे पायलट टेस्टिंग करायचे आहे असं कळल्यापासून मी आणि अमृत बरेच उत्साहात होतो. आम्ही आठवड्यातले 2-3 दिवस बसून कुमार निर्माणच्या तयार केलेल्या पुस्तकामधल्या गोष्टी वाचून काढत होतो. त्यावर चर्चा करत होतो. त्याचं गडचिरोलीमधल्या शाळेत पायलट करण्यासाठी परवानगी घेऊन आलो. आणि माणसांची भाषा या गोष्टीचं वाचन करायची प्रॅक्टिस सुरू केली. त्याबरोबरच आम्ही अजून 1-2 गोष्टी लिहिता कशा येतील त्याचाही विचार केला. आणि लिहायला सुरूवात केली. पण हे सगळं बरंच हळूहळू चाललं होतं.

धान्यापासून दारू तयार करण्याच्या प्रस्तावाला विरोध कसा करायचा याचं बोलणं सुरू होतं. निर्माणींनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषणाची साखळी तयार करायची आणि निषेध नोंदवायचा असं ठरलं. तेवढ्यात आम्हाला आयडिया सुचली की आपण या ताज्या प्रश्नावर कुमार निर्माण मार्फत मुलांशी बोलू शकतो. आम्ही दोघांनी यावर एखादं छोटंसं नाट्य बसवायचं असं ठरवलं. नंतर मात्र असं जाणवलं की हे सगळं खूप कृत्रिम वाटू शकेल. मुलांपर्यंत तो प्रश्न न पोहोचता त्या नाट्यामधल्या भावना पोहोचतील. दारूड्या माणसामुळे कसा त्रास होतो; हे नाट्यरूपानी दाखवण्याची गरजच नाही कारण ही मुलं आजूबाजूला प्रत्यक्ष ते पहात आहेत. त्यांना त्यात काहीच नवीन वाटणार नाही. 9वी च्या वर्गाशी बोलताना आपण तो प्रश्न जसा आहे तसा आणि त्यांना समजेल अशा पद्धतीनं सांगावा असं आमचं ठरलं. नुसतं सांगून थांबायचं नाही तर काहीतरी कृती कार्यक्रम करायचा असंही ठरलं. हे सगळं करण्यासाठी सगळ्यात उत्तम तारीख होती 7 जानेवारी. कारण त्या दिवशी माझं उपोषण होतं. त्याच दिवशी आपण शाळेत गेलो आणि बोललो तर त्याचा जास्त परिणाम होईल असं आम्हाला वाटलं.

शाळेत 3.30 ला गेलो. तिथे शाळेच्या गच्चीत आमची बसण्याची व्यवस्था केलेली होती. आजूबाजूला छान झाडं होती. सगळी मुलं सतरंजीवर बसली होती. मुलं आणि मुली असे दोन जाणवतील असे ग्रुप होते. आम्हा दोघांसाठी 2 खुर्च्या ठेवलेल्या होत्या. गेल्या गेल्या मुलांनी आमचं टाळ्या वाजवून स्वागत केलं. आम्हाला ते खूप अनपेक्षित होतं. त्यांना आम्ही कुणीतरी ‘’पाहुणे’’ वाटत होतो! आम्ही सहजपणे जाऊन मुलांमधे बसलो आणि मुलामुलींना छान घोळका करून एकत्र बसायला सांगितलं. थोडीशी कुजबूज झाली पण मुलं आमच्या आजूबाजूला घोळका करून बसली. आम्ही ओळख करून दिली आणि त्यांना आमच्या बरोबर दिदी तेरा देवर दिवाना गाणं म्हणायला सांगितलं. मुलं आता जोशात आली होती. त्यांना थांबवून आम्ही केळझरकर काकांनी केलेलं त्याच चालीवरचं ‘’दारू पितो करतो धिंगाणा.. अरे वेड्या हिनं लुटला रे जमाना! हे गाणं गायला लागलो. मुलांना खूप मजा वाटली. धान्यापासून दारूनिर्मितीचा प्रश्न हा त्यांच्या डब्यात मिळणार्‍या भाजीच्या, पोळीच्या धान्याचा आहे, कुण्या तिसर्‍या व्यक्तीच्या आयुष्याचा नाही, हे त्यांना आधी पटवून दिलं. अमृतने त्यांना हा प्रश्न अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितला. सरकार, दारूचे कारखानदार, दारू पिणारा, आणि सामान्य माणूस हे सारे जण या प्रश्नामधे गुंतलेले आहेत, हे समजावले. सगळे सांगून झाल्यावर आम्ही त्यांना विचारलं की ‘’तुम्हीच सांगा की या पूर्ण गोष्टीमधे गुन्हेगार कोण?’’ मुलांनी आपसुख बोलायला सुरूवात केली. आणि ते खूप मनापासून म्हणाले की‘’आपण सामान्य माणसं पण गुन्हेगार आहोत!’’..... आम्हाला खूप आश्चर्य वाटलं आणि कौतुकही वाटलं. त्या मुलांची प्रश्नाबाबतची समज अतिशय चांगली होती. ‘’आपण हे सगळं होऊ देतो म्हणून होतं”, असं एकजण म्हणाला. त्यांच्याच कडून मागणी आली की आपण काहीतरी केलं पाहिजे. काय करता येईल असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं की ‘’आम्ही दारू प्यायला नाही पाहिजे’’‘’दुसर्‍यांना दारू पिऊ नाही दिली पाहिजे पण यापलीकडे त्यांना जाता येत नव्हतं. मग आम्ही त्यांना काही आयडिया दिल्या.

त्यादिवशी आम्ही कोर्‍या चिठठ्या घेऊन गेलो होतो. त्या आम्ही त्यांना वाट्ल्या आणि त्यावर आपल्या food to alcohol च्या वेबसाइट चा पत्ता लिहायला सांगितला. चिठ्ठ्यांच्या मागच्या बाजूला धान्य हवे! दारू नको! असं लिहिलेलं होतं. आणि त्या चिठ्ठ्या शाळा संपल्यावर चौकामधे वाटायला आणि लोकांना समजावून सांगायल्या सांगितल्या. मुलांनी ते खूप मनापासून केलं. आम्ही नंतर वर्गामधे जाऊन फळ्यावर एक चित्र काढलं. ज्वारीच्या कणसाच्या देठातून दारूचा पेग बाहेर येत आहे , असे ते होते. मुलांनी ते चित्र त्यांच्या वह्यांमधे काढले. त्यांना शाळेतल्या 7वी आणि 8वीच्या मुलांना हा प्रश्न समजावून सांगायची आयडियापण खूप आवडली. तुम्ही उपोषण करून आमच्या साखळीमधे सहभागी होऊ शकता असं सांगितलं. एका मुलीनं दुसर्‍याच दिवशी करायची तयारी दर्शवली. मुलांनी आमचे फोननंबर घेतले आहेत. पुन्हा या असं सांगितलं आहे. त्यांना अजून आम्ही कुमार निर्माण या कन्सेप्ट बद्दल फार सांगितलेलं नाही. पुढच्या खेपेला जरूर सांगू.

संपूर्ण अनुभवातून मी अमृत बर्‍याच गोष्टी शिकलो. एकतर आम्हाला हा प्रश्न ताजा असल्यामुळे आणि तो अतिशय महत्त्वाचा वाटत असल्याने खूप नैसर्गिक पद्धतीने मुलांना सांगता आला. त्यात प्रश्न समजावण्यासाठी कुठल्याही इतर माध्यमाचा आधार घ्यावा लागला नाही. परंतु मुलांशी संवाद साधण्यासाठी मात्र गाणं, विनोद, गोष्ट, चित्र अशा माध्यमांचा उपयोग झाला. मुलांमधे मुलांसारखंच होऊन गेलं, त्यांच्या छोट्या छोट्या विनोदांमधे आपण सहभागी होऊन गेलो की त्यांना आपण ‘’कुणीतरी पाहुणे न वाटता, त्यांच्यातले वाटू शकतो. आम्ही मुलांना हा प्रश्न जड वाटेल का अशी काळजी करत होतो. पण असं जाणवलं की आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा ते विचार करत आहेत. कदाचित व्यक्त करत नसतील पण ते अनभिज्ञ नव्हते! त्यांना एखादी कृती करायची आहे म्हटल्यावर उत्साह आला. नाहीतरी काहीतरी बोअर लेक्चर सुरू आहे, असं वाटू शकलं असतं! काही मुलं खूप संवेदनशील होती कारण केलेल्या कृतीला नकारात्मक रिस्पॉन्स मिळाला तर त्यांना त्याचं वाईट वाटलं व त्यांनी तसं येऊन आम्हाला सांगितलं.


अजून खूप काही कराणं गरजेचं वाटतय. मुलांना परत भेटून अधिकाधिक खुलून संवाद साधायचा आहे. कुमार निर्माण अजून पायलट च्या स्टेजला आहे पण खूप उत्साह देणारं आणि अपेक्षा वाढवणारं आहे..... युवा निर्माणच्या रोपाची बीजं काळजीपूर्वक पेरायला हवीत!!  

-मुक्ता गुंडी

Saturday, January 2, 2010

जनसुनवाई

            गेल्या आठवड्यात नंदूरबार जिल्ह्यातल्या डनेल गावातलं रो.ह.यो.चं सोशल ऑडीट बघण्यासाठी मी आणि पीडी पुण्याहून निघालो होतो. पुण्याहून शहादा आणि तिथून पुढे धडगाव, मोलगी मार्गे डनेल.
अक्कलकूवा तालूक्यातले डनेल गाव. मध्य प्रदेश आणि गुजरात ही तिन्ही राज्ये इथून अगदी जवळ. नर्मदा या गावाजवळून वाहात जाते.
धडगाव ते डनेल जेमतेम तीस पस्तीस किलोमीटरचा रस्ता. पण इतका कच्चा की पोहचायला तब्बल अडीच तास लागणार होते. आदल्या रात्री पीडी पुढे गेला आणि मी योगीनीला मदत करण्यासाठी धडगावी थांबलो. रात्री उशीरापर्यंत काही कामे पूर्ण केली आणि पहाटे लवकर उठून डनेलला निघालो.
रस्त्यात मोलगीला काही वेळ थांबावं लागलं. नर्मदा बचाव आंदोलनाच्या एका कार्यकर्त्याला जबर मारहाण झाली होती. डॉक्टर त्याच्यावर उपचार करायला तयार नव्हते. तो सगळा गुंता सोडवून मोलगीहून निघायला दहा वाजले.
सोशल ऑडीट साठी आलेले शासकीय अधिकारी, योगीनी आणि गीतांजली या नर्मदा आंदोलनाच्या कार्यकर्त्या, पोलिसांची एक जीप, मिडियाची मंडळी, सोशल ऑडीट म्हणजे काय हे पाहायला जालन्याहून आलेली नाटकातली कलाकार मंडळींची एक गाडी आणि आम्ही, अशा सहा गाड्यांची वरात निघाली.
डनेल गावाला जाण्यासाठी या आधी रस्ताच नव्हता. सध्याचा रस्ता आहे तोसुद्धा दोन वर्षांपूर्वी झाला. पूर्वी सगळा प्रवास पायीच. रस्ता म्हणजे फक्त जेसीबीने करून ठेवलेला काय तेवढाच. डांबरीकरण नाही की खडी नाही. धक्के खात आजूबाजूचा सातपूडा पाहात आम्ही जात होतो. रस्ता संपला आणि डनेल गावात पोचलो तो पावसाला सुरूवात झाली.
सोशल ऑडीटसाठी गावात पेंडॉल टाकले होते. लोकांची बसायची व्यवस्था केली होती. आणि हळूहळू गावातली लोकं जमू लागली होती. काही लोकं नदीपलीकडून बार्जमधून येणार होती. ती आली की ऑडीटला सुरवात होणार होती. रो.ह.यो.अंतर्गत या भागात रस्त्याची काही कामं झाली होती. पण त्यात बराच भ्रष्टाचार झाला होता. त्याचंच आज सोशल ऑडीट होणार होतं.
रोजगार हमी योजना कायद्या अंतर्गत, गावात एखादं काम झालं असेल तर गावातल्या लोकांना झालेल्या कामाची तपासणी करण्याची मागणी करता येते. आतापर्यंत असं होतं की जर कामात घोटाळा किंवा भ्रष्टाचार झालाय अशी शंका आली तर गावातले लोक संबधित खात्यात तक्रार दाखल करू शकायचे. त्यानंतर पुढचा तपास आणि कारवाई करायचे सर्वाधिकार त्या संबंधित शासकिय अधिकार्‍यालाच असायचे.
मात्र झालेल्या कामाच्या संबंधित कागदपत्रांची मागणी आता लोकांना शासनाकडे करता येते आणि शासनाला ती पुरवावी लागते. हे सर्व शासनाच्या संबंधित अधिकार्‍याच्या आणि लोकांच्या उपस्थितीत घडून येतं. म्हणून ही जनसुनवाई. सध्या हा अधिकार रो.ह.यो. पुरता मर्यादीत असला तरी लवकरच शासनाच्या सगळ्या कामांच्या बाबतीत अशी मागणी करता येणे शक्य होईल.
बामणी, मोखाडा आणि चिमलखेडा अशा डनेल गावातील तीन ग्रामपंचायती मधे झालेल्या रोहयोच्या कामाचं हे सोशल ऑडीट होतं.
डेप्युटी कलेक्टर ( रो.ह.यो.), त्या गावचा बीडीओ, डेप्युटी इंजीनीअर, ग्राम रोजगारसेवक आणि ज्यांच्या आशिर्वादाने हा भ्रष्टाचार झाला तो राजकीय पुढारी, या तीन गावांतील मजूर आणि नर्मदा बचाव आंदोलनाची मंडळी अशी सगळी फौज उपस्थित होती.

मजूराचं नावं, त्याचे कामाचे दिवस आणि त्याला मिळालेली मजूरी मस्टरमधून वाचून प्रत्यक्ष लोकांकडून त्याची पडताळणी, असं ऑडीटचं स्वरूप होतं.
मस्टर वाचनाला सुरूवात झाली आणि पहिल्याच स्टेटमेंटला ऑब्जेक्षन घेत योगीनी ताईने पद्धतशीरपणे एकेक पुरावा सादर करायला सुरूवात केली. काही लोकांची नावे भलत्याच गावात दाखवली होती. खोटी नावे, खोटी जॉब कार्ड्स असा सगळा प्रकार होता.
शासनाची गोची अशी होती की झालेल्या कामाचा सगळा रीपोर्ट एन.आर.ई.जी. एस.च्या वेबसाईटवर टाकणं त्यांना बंधनकारक झालयं. त्यामूळे केंद्राकडून मिळालेली रक्कम आणि झालेल्या खर्चाची जुळवाजुळव करता करता त्यांची तारांबळ उडते. कारण बरीचशी कामे झालेलीच नसतात.
तपशीलवार रीपोर्ट बनवून वेबसाईटवर अपलोड करणे बंधनकारक असल्याने भ्रष्टाचार झालाय की नाही हे तपासणं आता आपल्याला फारच सोपं झालयं. अगदी एखाद्या मजूराचा जॉब कार्ड नंबर घेऊंन त्याचा दोन वर्षांचं रेकॉर्ड ट्रॅक करणेदेखिल शक्य आहे. पण त्या अडाणी मजूराला जिथे लिहितावाचताच येत नाही तो इंटरनेटवरून माहिती कशी काढणार..?
म्हणूनच नर्मदा बचाव आंदोलनातल्या योगिनी आणि गितांजली ताई लोकांना हे सगळं समजून देत होत्या. कसं आणि काय बोलायचं, काय प्रश्न विचारायचे तेही सांगत होत्या. जनसुनवाईमधे लोकांनी बोलावं हीच अपेक्षा असते.

मुद्दलात हा भ्रष्टाचार झालाय हे अगदी उघड गुपित होतं. सगळ्यांना ते माहितही होतं. पण ते सिद्ध करणं गरजेचं होतं. मग साक्षी पुरावे आणि सगळा गोंधळ सुरू झाला.
इंटरनेटवरील माहिती आणि मस्टर यांचा ताळमेळ जुळेना. कारण सगळं मस्टरच चूकीचं होतं. फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि डेप्युटी इंजीनिअरने गावात प्रत्यक्ष रस्ता न बांधता, तो बांधलाय असं दाखवून सगळा खर्च खिशात घातला होता. किती शांतपणे आणि पद्धतशीरपणे ही मंडळी भ्रष्टाचार करू शकतात ते आम्ही डोळ्यांसमोर पाहात होतो.
नुकतीच पेपर मधे या भ्रष्टाचाराबद्द्ल बातमी येऊन गेले होती. संबंधित व्यक्ती मयत असूनही दोन वर्षे तिला कामावर दाखवून मजूरी दिल्या गेली होती. ही बातमी पेपरमधे आल्यानंतर त्या मयताच्या विधवा बायकोचं अपहरण केलं गेलं. आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना खूनाच्या धमक्या आल्या. एकंदरच या भ्रष्टाचाराचा आवाका बराच मोठा होता.
पाच दिवसांच्या बाळंतिनीला सहा दिवस काम केल्यावर या लोकांनी एक रूपयाचीसुद्धा मजूरी दिली नव्हती. अशा अनेक संतापजनक गोष्टी उघड होत होत्या आणि लोकांचा संयम सुटत होता. नियम वाकवून, मोडून - तोडून पैसा गडप केला होता.
शेवटी शेवटी तर लोकं भलतीच संतापली. भाषा समजत नसली तरी त्यांचा राग आणि संताप मात्र समजत होता. कितीही ठरवलं, तरी तटस्थ राहून ते सगळं पाहाणं शक्य होत नव्हतं.
यथावकाश जनसुनवाई संपली. प्रोसिडिंग लिहून घेण्याच्या कामाला सुरूवात झाली आणि गावाहून आलेले मजूर लोक जेवायला बाहेर पडले. गावातल्या लोकांनीच जेवणाची व्यवस्था केली होती. आम्हीही तिथून उठलो आणि बाहेर पडलो.
सातपूड्यातलं हे डनेल नावाचं छोटसं गाव. गाव कसलं, छोट्या छोट्या पाड्यांचा समूह. पिडी म्हणाला, या गावात जिथे रस्ताच पोहचत नव्हता तिथे शासनाच्या योजना कशा पोहचणार? हे कळत होतं पण पटत नव्हतं. शासनाच्या योजना पोचल्या नव्हत्या पण भ्रष्टाचार मात्र पोहचलेला दिसत होता. सगळंच अस्वस्थ करणारं होतं.
आमच्याच वयाच्या रामसिंग नावाच्या गावातल्या एका तरूणाशी आम्ही बोलत होतो. जनसुनवाई सुरू असताना गावातली तरूण मंडळीसुद्धा बोलत होती, जनसुनवाईच्या परीणामांची कल्पना असूनही प्रश्न विचारत होती. डनेलमधलाच रणजीत वकिल झाला होता. तोही तावातावाने मूद्दे मांडत होता. गावात पुन्हा रोहयोची कामं होणं आता अवघड आहे हे माहित असूनही रामसिंग बोलत होता कारण ते सगळं सहन करून शांत बसणं त्यांना शक्यच नव्हतं.
शासनाकडून रोहयोच्या अंमलबजावणीची अपेक्षा करण्यापेक्षा गावातच रोजगार निर्मिती करून या व्यवस्थेला पर्याय उभा करणं मलाही पटत होतं. पण त्या परिस्थीतीत विरोध करणं गरजेच होतं.
डोकं भंजाळून टाकणारी ही परिस्थिती. नर्मदेवरचं ते धरण, त्यासाठी झालेलं आंदोलन सगळं डोळ्यापुढून सरकत होतं. नर्मदा बचाव आंदोलनाबद्दल ऐकून होतो. त्यामूळे त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल खूपच उत्सुकता होती.


शासनाने निर्णय घ्यायचे आणि लोकांनी ते भोगायचे. मग ते धरण असो किंवा धान्यापासून मद्यनिर्मितीचा उद्योग. खरं तर त्या धरणाचे फायदे कोणाला, तर शहरातल्या लोकांना. जमीन पाणलोटाखाली आणून शेती वाढवणं हे खरं तर दूय्यम कारण. खरं कारण शहरांना पाणी आणि वीज मिळायला हवी. त्यापायी नर्मदेच्या खोर्‍यातल्या कित्येक गावांना नुकसान भोगावं लागलं. अजूनही त्याचे परिणाम ही लोकं भोगतचं आहेत.

लोकं आक्रमक का होतात, शस्त्र हातात का घेतात हे आता थोडं फार कळू शकत होतं. डनेल गावाचे सरपंच आणि उपसरपंच दोघही गैरहजर होते. कारण या भ्रष्टाचारात त्यांचेही हात बरबटलेले होते. गावातल्या लोकांना तोंड देणं त्यांना शक्य झालं नसतं.
मला हे खूप महत्वाचं वाटलं. सध्या राज्यकर्त्यांना कुठलाच धाक उरला नाहीये. बी.डी.ओ. किंवा डेप्युटी इंजीनिअर जरी पुन्हा गावात येणार नसला किंवा त्यांचा गावाशी संबंध उरणार नसला तरी सरपंच मात्र गावातलाच होता. त्याला गावातच राहायचं होतं. त्याला असा धाक बसणं हे त्या जनसुनवाईचं खरं फळ होतं.
एकीकडे जनसुनवाईतून असा संघर्ष करत राहाणं आणि दूसरीकडे रचनात्मक कामं उभी करणं दोन्ही महत्वाचं. मेधाताईंच्या प्रयत्नांनी उभ्या राहिलेल्या जीवनशाळेत शिकलेला रामसिंग आज तिथल्याच आश्रमशाळेत शिक्षक बनून लहान मूलांना शिकवतोय. गावातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध बोलतोय. त्यालाही पुढे शिकायचयं पण दूर्गम भागामूळे पुढच्या शिक्षणासाठी अडचणी येताएत.
त्याच्याशी गप्पा मारताना त्याच्या स्वप्नातलं त्याचं गाव कसं असावं हेही त्याने आम्हांला सांगितलं. या दूर्गम भागात काय करता येऊ शकेल जेणेकरून शासनावर अवलंबून राहावं लागणार नाही? याची चर्चा आम्ही करत होतो. या सगळ्यातून त्याने स्वतःच मार्ग काढायला हवा हे तर खरच आहे, पण त्याला राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली तर मार्ग नक्कीच सोपा होईल.
रामसिंगचं राहतं घर असलेला पाडा तिथून बराच दूर होता. त्याने तोही दाखवला. तिथे पोहचायला एक छोटी दरी ओलांडून जावं लागतं. त्या दरीवर मधला पूल न बांधता दोन्ही बांजूंना रस्ता बांधल्याचं या भ्रष्ट अधिकार्‍यांनी दाखवलं होतं.
या निमित्त्याने रोजगार हमी योजना जवळून पाहायला मिळाली. जॉब कार्ड, फॉर्म चार आणि पाच अशा बाबी गडचिरोलीत काम करताना काही प्रमाणात समजल्या होत्या. या ऑडीटच्या निमीत्त्याने या सगळ्याची टेक्निकल बाबी,एन.आर.ई.जी.ए.ची वेबसाईट नीट पाहायला मिळत होती. योगीनी ताई स्वतः वकील असल्याने कायद्याच्या कचाट्यात या अधिकार्‍यांना कसं अडकवता येऊ शकतं तेही कळालं.
पण केवळ शासनाशी भांडून भ्रष्टाचार बाहेर काढणं पुरेसं नाही. त्याचबरोबर जीवनशाळेसारखे उपक्रमसुद्धा राबवावे लागतात. कारण त्या गावातल्या लोकांना कामं मिळणं महत्वाचं.
आम्ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधायचयं म्हणून हे ऑडीट पाहायला गेलो नव्हतो. पण संघर्ष करण्यासाठी सोशल ऑडीट हे किती प्रभावी माध्यम ठरू शकत ते जाणवलं. वेगवेगळ्या ठिकाणी अशी कामं करणार्‍य़ा योगीनी आणि गीतांजली ताईसारख्या मंडळींना एकमेकांचा किती उपयोग होतो ते समजत होतं. अगदी युनिकोड सारखं सॉफ्टवेअर इंस्टॉल करून देणं सुद्धा किती मदत करून जातं..!
आता रो.ह.यो. मधे पुढे काय करता येईल ते बघायचयं.



- सागर जोशी,
निर्माण.
sagarnjoshi@gmail.com

Friday, January 1, 2010

"धान्यापासून दारू"विषयी गाणे!

(चाल: बिलनची नागीण निघाली)

राजकारणी लोक ही माजली
(यांच्या) स्वार्थाची तुतारी वाजली
वाईट कर्माला बघा ही धजली
लोकांना दारु हो पाजली ॥ध्रु॥

कायद्याची धड माहिती नाही, जनता ही भोळी निघाली
पाहुनी हा ज्ञानाचा अंधार, मंत्र्यांनी हो पोळी भाजली
जनता ही भोळी निघाली
मंत्र्यांनी पोळी हो भाजली
काळ्या धंद्यांना बघुन यांच्या
नैतिकता सुद्धा हो लाजली ॥1॥

देत नाही धान्याला भाव, पिकांची होते नासाडी
उपाय म्हणून त्यावर आता, दारुला देती सबसिडी
म्हणे पिकांची होते नासाडी
कारखांन्यांसाठी सबसिडी
मंत्री आहेत हो हे गारुडी
जनतेला करती दारुडी ॥2॥

दारु पिऊन पिऊन रे बाबा, नाश होईल आयुष्याचा
सर्व पीकं जाईल ह्यात, धोका वाढेल भविष्याचा
नाश होईल आयुष्याचा
धोका वाढेल भविष्याचा
अन्न – पाण्याच्या दुर्भिक्ष्याचा
खाद्यान्नाच्या सुरक्षेचा ॥3॥

स्वार्थाबिना विचार नाही, राजकारणी आहेत हो वल्ली
ह्यांच्यासाठी लोकांनी सगळ्या, दारु पिऊन व्हावे टल्ली
राजकारणी आहेत हो वल्ली
दारुने व्हा म्हणती टल्ली
करी कायद्याची पायमल्ली
स्वार्थासाठी एककल्ली ॥4॥

- अमृत बंग

Wednesday, December 23, 2009

यमगरवाडी बद्दल थोडंसं!!

खरं तर सुरुवात कशी करावी ते कळत नाहीये आणि हा माझा लेख लिहिण्याकचा तसा दुसराच प्रसंग आहे....

भटके विमुक्तं विकास प्रतिष्ठातन (BVVP) गेल्या 14 वर्षांपासून विविध समाज प्रश्नां वर काम करते आहे. प्रतिष्ठारनच्याव विविध प्रकल्पांवपैकी यमगरवाडी प्रकल्पव (केशवनगर विद्या संकुल) हा महाराष्ट्राशत उस्मानाबाद जिल्ह्यात, तुलजापूरजवळ नांदुरी येथे राबवण्यात येतोय. हा प्रकल्पं 1993 मध्येण 18 एकर जागेवर श्री रमेश छटुफले यांनी दिलेल्या जमिनीवर 25 भटक्या  मुलांना घेऊन सुरु झाला. आज गिरीश प्रभुणे या कल्पाक आणि खंद्या कार्यकर्त्यामुळे यमगरवाडीला निवासी शाळा सुरु आहे. या शाळेत 400 मुले आणि 200 मुली शिकत आहेत. या शाळेत मुख्यित्वेम पारधी समाजातील मुले आहेत. या उपेक्षित समाजातील पालकांमध्येआ जागृतीचं काम करणं, त्यांहच्यात मुलांना एकत्र करुन शिक्षण देणं हे एक आव्हातनात्मचक कार्य आहे, जे गिरीश प्रभुणें करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच मी अहमदनगरला एका शिबिरात गेलो होतो आणि तिथं मला गिरीश प्रभुणे यांच्या  कार्याबद्दल माहिती मिळाली. त्यांाचं कार्य समजून बघणं, समजून घेणं आपल्याचला जमेल त्याक वेळात करायचं असं मी ठरवलं होतं.

आणि नेमकं 15 तारखेला माझा मित्र राजन याचा मला फोन आला की, “यमगरवाडी हा एक अनाथ मुलांकरता (पारधी समाजातील) प्रकल्पत चालतो. तेथील काही मुलांना दरवर्षी दिवाळीकरता पुण्यापत वेगवेगळ्या इच्छुरक लोकांकडे (2-2 किंवा 1-1 मुलांना) रहायला पाठवलं जातं. तर तू तुझ्याकडे एका मुलाला घेऊन जाशील का?” असा मित्राचा प्रश्नय ऐकताच मनात होकार देण्यााची खूप इच्छा् असूनही मी “नाही” म्हीटलं कारण मला त्यामच काळात वाईला जाणं आवश्य क होतं. त्यायवर तो म्हलणाला, “हरकत नाही मात्र ज्या‍वेळी या मुलांची सहल निघणार आहे त्याहवेळी या मुलांसोबत त्यांणच्याहकडे बघायला म्हजणून नक्कीस ये”. मी “हो” म्हेटलं.

सहलीला निघेपर्यंत माझी अशी कल्प्ना होती की असतील 20-25 मुलं. पण जेव्हाण 20 तारखेला आम्हीी सगळे रात्री एकत्र जमलो तेव्हाप मला कळालं की एक नाही दोन नाही तब्बाल 82 छोटी (43 मुलं आणि 39 मुली) मुलं होती. मला क्षणभर भीतीच वाटली की आता आपलं कसं होणार? एक तर लहान मुलाला सांभांळणं किती जिकिरीचं काम असतं. आणि आपला तर अशावेळी गोंधळच होतो, इथं तर 10-11 वयोगटातली ही मुलं, कसं सगळं सुरळीत पार पडणार ?

20 तारखेला मध्यारात्री 1 वाजता आमची सहल निघाली. सहलीला निघताना मुलं ज्यान पध्द तीनं ऐकत होती, सूचना पाळत होती, लहान मुलांची मोठी मुलं काळजी घेत होती ते सगळं पाहून माझी सुरुवातीची भीती पळाली आणि खात्री झाली की आता सहल छानच होणार. या मुलांमध्ये राहिल्यामुळे वयानं मोठ्ठे ही माझी संकल्परनाच बदलली. खरंच मोठं कोण? लहान सहान कारणांवरुन भांडणारी मोठी माणसं ? की दुस-याला आपला त्रास होऊ नये म्हलणून समजून घेणारी, समजूतदारपणे वागणारी ही लहान मुलं ? (सॉरी, खूप मोठ्ठी मुलं! )

आम्ही 21 तारखेला सकाळी चिपळूण येथे पोहोचलो. माझं हे स्पमष्टीवक्तेपपण कदाचित वाचणा-यांपैकी काहींना आवडणार नाही पण सहलीचं आयोजन चांगल्याा पध्दनतीनं केलं गेलं नाही हे लगेच प्रत्य‍यास आलं. कारण चिपळूणमध्येे कोणाकडे जायचं हेच नीटसं माहीत नव्हेत. आम्हीे अर्धा तास फिरत राहिलो. शेवटी चितळेहॉल शोधत एका ठिकाणी गेलो तर त्यां नाही काहीच कल्पधना नव्हणती. मात्र पाच मिनिटं या प्रकल्पाठवर बोलल्यागवर ते म्हटणाले, “मला काहीही अडचण नाही. तुम्हीं इथं थांबू शकता”. आणि त्यांलनी काही पुढं न बोलता पाणी तापायला ठेवलं. ब-याच माणसांना मदत करायची, चांगलं काम करण्यााची खूप इच्छाह असते पण काही वेळा ती मदत मागीतलीच जात नाही असंही मला वाटलं. तसंच कोणत्याी हॉलवाल्या नं 110 लोकांची सोय स्वततःची गैरसोय करुन केली असती?  आम्हाय सगळ्यांची त्यांकनी उत्तम व्यआवस्थाव केली.

हे सगळं होताच आम्हायला ज्या चितळ्यांकडे जायचं होतं त्यां चा अखेर पत्ता सापडला. आमच्याहतले निम्मेा लोक आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आमची चहा-नाश्याहो  ची सोयही केली होती. पण त्यान चितळे (हॉलवाले) ना हे माहीतही नव्ह त तरी त्यांॉनी आमची सोय केली त्यां चा मला अभिमान वाटत होता. अर्थातच आम्हालला अभिप्रेत असलेल्या चितळेंनीही आमची उत्तम व्यअवस्था केली.

सर्व आवरुन आम्ही 11.30 ला शिवसृष्टीअदर्शन येथे जाण्यास निघालो. मी आणि योगेश यांनी 5 नम्बथर गटाची जबाबदारी घेतली. आम्हाला तसं पहाता काहीही करायचं नव्हमतंच. कारण आमच्या  गटात 10 जण होते आणि त्या‍तला अर्जुन हा 8 वर्षाचा मुलगा हा गटप्रमुख होता. लिडर म्हणजे काय, तो कसा सर्वांना समजून घेतो, सर्वांबरोबर सतत असतो, याचे धडे या लहान मुलांकडून घ्यातयला हवे. शिवसृष्टी दर्शन खूपच छान झाले. मला सारखं वाटायचं की आता ही मुलं गोंधळ घालतील आणि मग मला जरा काम मिळेल. पण नाहीच. संपूर्ण प्रवास मुलांनी गोंधळ केलाच नाही.

माझा स्वगतःबददलचा एक पक्का समज होता की आपल्याकला लहान मुलांसोबत अजिबात खेळता येत नाही, बोलता तर अजिबातच येत नाही. काही प्रमाणात हा समज खरा म्हणता येईल. आणि अनेकदा तसा अनुभवही आला आहे पण...

ही सहल इतकी वेगळी होती. दुपारी मी कागदाच्याक काही वस्तू  करायला सुरुवात केली आणि काय... लहान, मोठी सगळीच मुलं मला मला करीत एकच गोंधळ सुरु झाला. मला शिकवा, मला पण... अरे बापरे, कोणाकडेही न जाणारी ही मुलं, हातात कॅमेरा (कागदाचा) घेऊन माझ्याकडे धावत सुटली. पक्ष्यां चे पंख फडफडले आणि मुलांचा पुनश्चर गोंधळ सुरु झाला. कागदाच्याु कोल्ह्या ने मुलांची नाकं पकडली आणि मुलांच्याच चेह-यावर हास्य  पसरलं. ओरिगामी शिकवणा-या शाळेतल्याय बाई, माझे वडील, काका, काही मित्र, आणि अनिल अवचट या सर्वांचे मी मनातून खूप खूप आभार मानले. हॅट्स ऑफ!  की ज्यांभच्याचमुळे मी मुलांच्यात एवढ्या जवळ जाऊ शकलो आणि मुलंही यामुळं माझ्या जवळ आली.

पण वाईट गोष्ट अशी की माझ्याकडे पुरेसे कागद नव्होते. मला खूपच वाईट वाटलं. मी फक्त  काहीच मुलांना कागदाच्याव वस्तू. करुन देऊ शकलो. ज्यांनना मला हे देता आलं नाही त्या चं मला टोचणी लागलीच. पण हेही लक्षात आलं की या अनुभवातूनच शिकायचंय. अनुभवासारखा दुसरा गुरु नाही!

संध्यांकाळी 4 वाजता आम्ही समुद्रावर पोचलो. तिथं खूपच धमाल आली. माझ्यातला गुंडपणा उफाळून वर आला. मी एकेकाला धरुन सरळ पाण्यापत बुडवून काढलं. इतरांवरही पाणी उडवत राहिलो. मुलंही मस्तन मजा करीत होती. गुडघाभर पाण्या च्यार पुढं जायचं नाही ही सूचनाही तंतोतंत पाळत आनंद घेत होती. पोरं वाळूत मनसोक्तआ खेळत होती. शंख, शिंपले गोळा करीत होती. माझ्याकडे कॅमेरा नव्ह ता याचं मला अतीव दुःख त्याक्षणी झालं.

सूर्यास्त  तर अप्रतिम होता. इतर ठिकाणांपेक्षा हा सूर्यास्ति पहाणं म्ह णजे एक वेगळाच अनुभव होता. बस्सत, फक्त  बघतच रहावं, दूर दिसणा-या होड्या, उडणारे पक्षी, समुद्रात हळूहळू बुडणारा सूर्य आणि त्या्चा लालेलाल तेजस्वी पण बघता येइल असा गोल गोळा...व्वा!  काही गोष्टी तर शब्दाडत न पकडता येणा-या असतात....

तिथून मात्र आम्ही रत्नागिरीला मुक्काममाला पोहोचलो. तिथं मस्तम गरमागरम पुरीभाजी, शिरा, भात असं जेवण करुन ताणून दिली. रात्री डासांनी आमच्यारवर भरपूर ताव मारला ही गोष्टग निराळी.

दुस-या दिवशी म्हरणजे 22 तारखेला सकाळी आवरुन आम्हीव 11 वाजण्याच्या सुमारास भरपूर नाश्ता‍ करुन व सोबत जेवण घेऊन बाहेर पडलो. वेळणेश्वबर या प्रसिध्दन टेकडीवरील मंदिरामध्येव जाऊन दर्शन घेतलं. आजुबाजूला डोंगराळ भाग आणि मस्तत जंगलाचा परिसर होता. तिथून आम्हीस गणपती पुळे येथे जायला निघालो. मध्येस वाटेत एक बस बंद पडली. मग काय, तासभर वायाही गेला. रस्याग क त स्वाेमी स्वररुपानंद यांचं मंदिर होतं, तिथंही जाऊन आलो. गणपती पुळ्याला पोहोचलो तर उन प्रचंड पडलं होतं. आणि भूकही चांगलीच लागली होती. आणि समुद्रही एकीकडे खुणावत होता. पण आधी जेवण, मग थोडी विश्रांती आणि नंतर समुद्र असा प्राधान्यिक्रम ठरवून आम्ही  त्यादप्रमाणेच कृती केली.

मी तर समुद्रावर खूप फिरलो. पाण्या तून विचार करीत करीत इतका चालत गेलो की किती दूर गेलो आहोत याचा अंदाजच आला नाही. आत्ता असं लक्षात येतंय की समुद्राचं हे वैशिष्ट्य च असावं की त्या् पाण्यामतून आपण पुढे चालताना कळतच नसावं. कारण लाटा अलगद आपल्या  पायावर येतात, हळूवारपणे आपल्याा पायाखालून वाळू नेतात. परत एक नवीन लाट येते आणि तिच्याअसोबत थंडावा देणारी एक झुळूकही आणि त्याय येणा-या धुंदीतच आपण चालतच रहातो. कितिक वेळ...

जवळपास अर्धा तास चालल्यायवर मला आपण दूरवर आल्यासचं लक्षात आलं. तिथून मंदिर अगदीच छोटं दिसत होतं. आणि परतण्यासाठी फक्त 15 मीनिटं शिल्लक होती. हे लक्षात येताच मात्र मी पाण्याितून अक्षरशः पळत सुटलो. पण पाण्या तून सावकाश चालणं जेवढं आल्हाणददायक तेवढंच पळणं मात्र तापदायक...पण करतो काय ?

धापा टाकत परत पोहोचलो सगळी निघायच्या  बेतात होती. मी हुश्शत केलं आणि पुढच्यार वेळी घड्याळाकडे लक्ष ठेवायचं असं मनाला बजावलं. या सगळ्यात जेवण, विश्रांती गेली याचा मात्र जराही पश्चाणताप झाला नाही. कारण माझी ही समुद्रफेरी खूपच छान झाली. (हं बरोबर सोबत कोणी असतं तर अजून खूपच मजा आली असती हेही तितकंच खरं...)

आणि 5 वाजल्यांपासून परतीचा प्रवास सुरु झाला. जरासा कंटाळलोही. मात्र मला गाडी चालवणा-या ड्रायव्हलरकाकांचं खूपच कौतुक वाटलं. दोन दिवसात जवळपास 18-20 तास त्यां नी ड्रायव्हिंग केलं. एक रात्र तर संपूर्ण जाग्रण केलं पण जराही कुरकूर नाही की तक्रार नाही. उलट म्ह णाले, मुलांकडे बघून थकवा येतच नाही. उलट उत्साकह येतो. मी त्यां च्या शी चांगल्याेच गप्पाबही मारल्याव.

या संपूर्ण प्रवासात मी कितीतरी गोष्टीय शिकलो. काही शब्दाीत सांगता येतील आणि काही सांगताही येणार नाहीत अशा... नाव पुढे पुढे न करता नावाशिवाय कामं करणारी, श्रेय न घेणारी, काम महत्वा्चं मानणारी, मुलांच्या आनंदाकरता काम करायचं बाकी गोष्टींवचा बाऊ न करणारी माणसं बघितली. लहान वयात हेवेदावे, भांडणं विसरुन मोठी झालेली मुलंही बघितली. छोट्या छोट्या गोष्टीित आनंद मानणारी मुलं बघितली. आणि विचारात पडलो की आपण तर असं काहीच करत नाहीत. घरात 10-10 जोड कपडे असूनही दिवाळीत नवे कपडे घेतोच, मोठ्या भावाला जास्ती फटाके आणले म्ह,णून भांडणारे भाउ, फराळाला लाडू केले नाही म्हरणून आईवर चिडणारी मुलं हे सगळं कुठे आणि एक चॉकलेट मिळालं की आनंदात त्याआ चॉकलेटच्याम कागदाचीही वस्तू बनवण्याडस उत्सूक असलेली, कोणाच्यातरी कुशीत प्रेमानं झोपता आलं म्हंणून, प्रेमानं कुणी थोपटलं म्होणून आपल्याच ताई-दादांचं ऐकणारी, लहानलहान गोष्‍टींत सुख शोधणारी ही मुलं कुठे आणि...

पुढच्या  दिवाळीत कमीत कमी 5-6 मुलांना तरी मी माझ्या घरी घेऊन येणार हे नक्की, असं ठरवूनच मी सुखानं झोपेच्या स्वाधीन झालो. 

-सिद्धार्थ प्रभुणे

Tuesday, December 22, 2009

माहितीचा अधिकार आणि मी

ऑगस्‍ट 25, 2009, च्‍या दै. लोकसत्तामधील एक बातमी आली होती ‘धान्याधारित मद्यार्कनिर्मितीसाठी सरकारची खैरात; उत्पादनशुल्कात भरीव माफी’ बातमी वाचून धक्‍काच बसला. संत्र, द्राक्ष्‍यासारखी फळंही कमी पडली की काय म्‍हणून आता सरकारनं चक्‍क जीवनावश्‍यक धान्‍यापासून दारु बनवायचा घाट घालावा ? आणि ही प्रक्रिया स्‍वस्‍त व्‍हावी म्‍हणून दारु उत्‍पादकांना सरकारनं सबसिडीही जाहीर केली. रॉकेल, घरगुती गॅस, रासायनिक खतं, किटकनाशकं यांना सबसिडी देणं एकवेळ ठीक पण दारुला सबसिडी? कशासाठी ? तर म्‍हणे धान्‍यापासून दारु बनवणं हे मळीपासून दारु बनवण्‍यापेक्षा महाग असतं. आता उद्या सरकारनं सिगारेटलाही सबसिडी जाहीर केली तर त्‍यात आश्‍चर्य वाटायला नको. का तर यातून त्‍यांना महसूल मिळतो.





 धान्याधारित मद्यार्कनिर्मितीला प्रोत्साहन देण्‍याचा महाराष्‍ट्र सरकारचा निर्णय अत्‍यंत चुकीचा आहे हे कोणालाही पटेल. दारुमुळे बेचिराख, उध्‍वस्‍त होणारी माणसं, संसार दिसत असताना सरकारनं दारु निर्मितीला प्रोत्‍साहन देण्‍यासाठी सबसिडी द्यावी हे योग्य नाही. एका बाजूनं ग्रामपातळीवर दारुबंदी योजना मांडायची आणि दुस-या बाजूनं फक्‍त काही धनदांडग्‍या  राजकारण्‍यांच्‍या स्‍वार्थासाठी अशा प्रकारच्‍या योजनांना सबसिडी देउन त्‍यांना आणखी धनवान करायचं तेही सर्वसामान्‍यांच्‍या पैशातल्‍या करांतून हे पटत नाही.

ही सबसिडी देण्‍यामागची सरकारची भूमि‍का अशी आहे की, ‘गेल्‍या काही वर्षांमध्‍ये महाराष्‍ट्र राज्‍यात ज्‍वारीचं दरएकरी उत्‍पादन व ज्‍वारीच्‍या पिकाखालील एकूण क्षेत्रकमी होत आहे. या सबसिडीमुळे दारुच्‍या     निमित्ताने ज्‍वारीचं उत्‍पादन वाढेल व शेतक-यांना त्‍यांच्‍या मालाला योग्‍य  भाव मिळेल आणि विदर्भ-मराठवाडयातल्‍या शेतकर्‍यांच्या आत्‍महत्या कमी होतील.’ खरं पहाता, विदर्भ-मराठवाड्यातील ज्‍वारी, बाजरी इ. पिकांचे उत्‍पादन कमी असण्‍यामागे सिंचनाचा अभाव, नवीन तंत्रज्ञान, बी-बियाणे यांचा अभाव ही काही प्रमुख कारणं आहेत. द्यायची सबसिडी तर शेतक-यांना द्या. दारुउत्‍पादकांना का ?

तसंच धान्‍याधारित मद्यार्क निर्मितीतून किती प्रमाणात पिण्‍यासाठीची दारु व औद्योगिक वापरासाठीचे अल्‍कोहोल तयार व्‍हावे यावरही सरकारने काहीच नियंत्रण ठेवलेलं नाही. यावरुन हेच स्‍पष्‍ट होतं की सरकारमधील काही स्‍वार्थी राजकारण्‍यांसाठीच ही योजना साकार झाली आहे. सर्वसामान्‍यांना या योजनेपासून होणा-या दूष्‍परिणामांना तोंड द्यावं लागू नये यासाठी आपण एकत्रितपणे विरोध केलाच पाहिजे. आणि यासाठी आपल्‍या हाती एक मोठं शस्‍त्र आहे. ते म्‍हणजे माहितीचा अधिकार यानेके RTI !

माझा आरटीआयचा अनुभव ऐकायचाय?

सचिनच्‍या सांगण्‍यावरुन 7 नोव्‍हेंबरला मी धान्‍याधारित मद्यार्क निर्मितीच्‍या राज्‍य उत्‍पादनशुल्‍क विभागात आरटीआयचा अर्ज दाखल केला. मला अगदी मनापासून सांगावं वाटतं की अर्ज दाखल करताना मला आरटीआयविषयी काहीही माहिती नव्‍हती. त्‍या दिवशी पब्लिक इन्‍फर्मेशन ऑफिसर हे उपलब्‍ध नव्‍हते. मी अर्ज तर दाखल केला आणि वाटलं आता 30 दिवसांत कधीतरी उत्तर येईल. तत्‍काळ उत्तराची अपेक्षा नव्‍हतीच.

दोन-तीन दिवसानंतर एका सायंकाळी मला माझ्या मोबाईलवर माहीत नसलेल्‍या व्‍यक्‍तीचा मिसकॉल दिसला. कोणी केला असेल या कुतूहलापोटी मीही मिस कॉल पुनश्‍च त्‍या नंबरला दिला. आणि लगेच मला त्‍या नम्‍बरवरुन कॉल आला. ती व्‍यक्‍ती बोलत होती, “आपण वाकळे ना ? मी उत्‍पादनशुल्‍क विभागातून पब्लिक इन्फर्मेशन ऑफिसर पुजलवार बोलतोय. तुम्‍ही दाखल केलेल्‍या अर्जाविषयी बोलायचंय....” मी तर एकदम गोंधळूनच गेलो. इतक्‍या लवकर प्रतिसाद आणि तोही असा एकदम मोबाइलद्वोर म्‍हणजे मी कल्‍पनाही केली नव्‍हती.  कसंतरी स्‍वतःला सावरत मी त्‍यांच्‍याशी बोललो. आमची भेटीची वेळ ठरली. त्‍यांच्‍याकडे जी कागदपत्रं आहेत ती मी जरुर बघावी असंही त्‍यांनी सुचवलं.

सरकारी अधिका-याच्‍या या सौजन्‍यशील आणि तत्‍काळ प्रतिसादानं मी जाम सुखावलो. खरंतर त्‍यांचं अभिनंदनच केलं पाहिजे असंही मला वाटलं. आणि मी दुस-या दिवशी छानशी टवटवीत अशी दोन गुलाबांची फूलं घेऊन त्‍यांच्‍या भेटीला गेलो.

दुपारी एकच्‍या सुमारास मी त्‍यांना भेटलो. त्‍यांचं अभिनंदन केलं. मी देऊ केलेली फुलं त्‍यांनी मनापासून स्‍वीकारली. पुजलवार हे अधिकारी वयानं 40 ते 45 च्‍या आसपास असावेत. त्‍यांच्‍याकडील पद हे प्रभारी स्‍वरुपाचं होतं. त्‍यांनी सरळ मुद्याला धरुनच बोलणं सुरु केलं. ते म्‍हणाले, “तुम्‍ही विचारलेली सगळी माहिती आमच्‍याकडे उपलब्‍ध नाही ती मुंबई आणि कारखान्‍यांकडून मागवावी लागेल. पण सध्‍या काही प्रकल्‍पांची कागदपत्रं आहेत. ती तुम्‍ही पाहू शकता”.

मी त्‍यांनी दिलेल्‍या फाईल्‍स बघितल्‍या. त्‍यांनी दिलेल्‍या माहितीनुसार सध्‍या आदित्‍य ब्रेव्‍हरिजचं भेंडोळे इथे उत्‍पादन सुरु झालं आहे आणि प्रणव ऍग्रोटेक यांचंही उत्‍पादन सुरु होणार आहे.मी त्‍यांना सध्‍या उत्‍पादन घेत असलेले आणि मंजूरी मिळालेले कारखाने यांची कागदपत्रं मला हवी आहेत असं सांगितलं. तसंच उत्‍पादन सुरु नसलेल्‍याही कारखान्‍यांची कागदपत्रं मिळावीत असं सांगितलं. त्‍यांनी मला त्‍या कागदपत्रांच्‍या फोटोकॉपीज दिल्‍या.

माझ्याशी त्‍यांनी गप्‍पाही मारल्‍या. मी त्‍यांना लोकसत्तामधली बातमी दाखवली. पण त्‍यांनी विशेष उत्‍सुकता दाखवली नाही. येत्‍या 2-3 दिवसांत मी राहिलेली कागदपत्रं देतो असं त्‍यांनी सांगितलं. कामासंदर्भात ते काही वेळासाठी बाहेर निघून गेले.

त्‍यांच्‍या कार्यालयातील एक सहकारी धुमाळ यांच्‍यासोबत मी बसलो. मनात विचार करीत होतो, येताना नाही म्‍हटलं तर एक भीती घेऊनच मी आलो होतो. काय बोलायचं, काय मिळवायचं याचा हिशोब मनात करीत बसलो होतो. इतक्‍यात समोरनं दोन पोलीस आले आणि ते धुमाळांशी काही बोलू लागले. माझ्या मनात भीतीनं जास्‍तच ठाण मांडलं. मला एकाएकी 6 नोव्‍हेंबरला इंडियन एस्‍प्रेसमध्‍ये आलेली बातमीच आठवली. 42 harassed; many in jail for seeking into under RTI in Bihar… आठवून अंगाला कापरं सुटलं. वाटलं पुजलवारांनी हे पोलीस आपल्‍यासाठीच तर नाही ना पाठवले. पण ते सगळे माझ्या मनाचेच खेळ होते. पोलीस धुमाळांशी बोलून निघून गेले. आणि अर्ध्‍या तासानंतर मला राहिलेल्‍या कागदपत्रांची झेरॉक्‍स मिळाली. बाकी माहिती मला 2-3 दिवसांनंतर मिळेल असं त्‍यांनी सांगितलं हेातंच. मी निघताना झेरॉक्‍स कागदपत्रांच्‍या पैशांविषयी विचारणा केली. पण त्‍यांनी ते घेतले नाहीत. मी मिळालेल्‍या कागदपत्रांसहित बाहेर पडलो.

असा माझा आरटीआयचा अनुभव मजेशीर राहिला. मला त्‍यातून माहितीच्‍या अधिकाराविषयी बरंच शिकायला मिळालं. खरं सांगायचं झाल्‍यास माझ्यातल्‍या एका सामान्‍य नागरिकाला माहितीच्‍या अधिकाराची ताकद किती आहे याचा एक छानसा अनुभव आला.

अधिक माहितीसाठी: www.foodtoalcohol.wordpress.com

-अमोल वाकळे

Thursday, December 3, 2009

माणगावला भेट

गडचिरोलीतल्या रोजगार हमी योजनेच्या कामाच्या संदर्भात एखाद्या कार्यक्रमात लोकांना कसे सहभागी करायचे, संघटित कृती कशी घडवून आणायची, त्याच्या पद्धती काय असतात इत्यादी बाबत मनात विचारमंथन सुरु होते. सचिन तिवले याला नंदूरबार जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करतांना असेच काही प्रश्न पडत होते. उल्का महाजन ह्या रायगडातील काही तालुक्यांमध्ये लोक संघटनातून चांगले काम घडवून आणत आहेत अशी माहिती दत्ता बाळसराफ यांनी दिली आणि त्यांनी आमची तशी भेट आयोजित सुद्धा केली.

निर्माण फेलोशीपची कार्यशाळा संपवून सकाळी मी आणि सचिन पुण्याहून माणगावला निघालो. वाटेत ताम्हिनी घाट लागला. पावसाळा नुकताच संपलेला असल्यामुळे डोंगर हिरवेगार दिसत होते. घाटातनं प्रवास करत असतांना दोन वर्षांपूर्वी सायकलीवरुन केलेल्या पुणे ते रायगड अशा मुशाफिरीच्या आठवणी मनात जाग्या होत होत्या. गाडीच्या भरधाव वेगामुळे कधी कधी मनाला भीती वाटायची आणि ते (मनातल्या मनात!) ड्रायव्हरला ओरडून सांगायचे, “सावकाश रे बाबा! मला अजून जगायचं आहे. काही करुन दाखवायचं आहे.”
अकराच्या सुमारास सुखरुपपणे माणगावला पोहोचलो. टुमदार घरे न्याहाळत, चिखल तुडवत, रस्ता चूकत आम्ही ‘सर्वहारा जन आंदोलना’च्या कार्यालयात पोहोचलो. कुठेही संघटनेचे बोर्ड, बॅनर किंवा पोस्टर असं काहीचं दिसत नव्हतं. तीन खोलींच्या त्या कार्यालयात दोन कपाटं, एक लाकडी टेबल, काही खुर्च्या आणि स्वयंपाकघरातील काही भांडी असे मोजके सामान होते. मागाहून आम्हाला कळालं की संघटनेचं कार्यालय सुद्धा कायमस्वरुपी नव्हतं आणि संघटनेकडे स्वतःची अशी स्थावर मालमत्ता नाही. “आम्हाला त्याची गरजच वाटत नाही”, उल्काताई सांगत होत्या, “आर्थिक असुरक्षितता ही आमची ताकद आहे”. त्यांच्या मते जर संघटना लोकांसाठी काम करत असेल तर लोकच संघटनेला मदत करतील. (हा मुद्दा प्रचंड ‘वादनीय’ आहे.)

कार्यालयात हळूहळू कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. त्या दिवशी ‘विधानसभा निवडणूकीत संघटनेची राजकीय भूमिका काय असावी’ या संदर्भात एक मिटींग आयोजित करण्यात आलेली होती. मिटींगला जवळजवळ ७० लोक उपस्थित होते. त्यात ४५ तरी महिला असतील. आदिवासी महिलाही पुढाकार घेऊन स्वतःची मतं मांडत होत्या. त्या कातकरी लोकांच्या चेहर्या वर उंचावलेला आत्मविश्वास (self confidence) तर बोलण्यात राजकीय कृतीशीलता (political activism) स्पष्टपणे जाणवत होती. मिटींग खुपच लोकशाही पद्धतीने झाली. उल्काताई स्वत: कमी बोलत होत्या (जे अनेक नेत्यांना जमत नाही.). संयमाने चर्चा घडवून आणत होत्या.

मिटींगच्या समारोपानंतर उल्काताईंशी बोलायला सुरुवात केली. सामाजिक, आर्थिक, राजकीय शोषणाविरुद्ध संघर्षात्मक काम ही कार्यपद्धती आधीच ठरलेली. जुन्या व्यवस्थेतील सरंजामी आणि नव्या बाजारु, भांडवली अर्थव्यवस्थेतील काही लुटारु प्रवृत्तींविरुद्ध त्यांचा संघर्ष सुरु आहे. त्यात मुख्यत: लोक संघटन, मोर्चा, धरणे, उपोषण, सत्याग्रह, राजकीय पाठींबा, विधीमंडळात प्रश्न उपस्थित करणे इत्यादी पद्धतींचा वापर असतो. शोषणासंबधीचे जसजसे मुद्दे येत गेले, त्यानुसार त्यांचे काम आकारास येत गेले. सुरुवातीलाच त्यांना किमान मजूरीचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. लोकही त्या बाबतीत बोलायचे. प्रत्यक्षात तो प्रश्न हाताळतांना लोकसहभाग मिळालाच नाही. त्या कारणांचा शोध घेतल्यावर त्यांच्या लक्षात आले की जरी किमान मजूरीचा प्रश्न महत्त्वाचा असला तरी त्या प्रश्नाला इतरही सामाजिक, आर्थिक बाजू आहेत. तो ‘प्रक्षोभक’ मुद्दा लोकांना आणि संघटनेला सुद्धा अगदी सुरुवातीला पेलवणारा नव्हता. मग काही काळ लोकांमध्ये राहून, संवाद साधून दळी जमिनीचा महत्त्वाचा प्रश्न समोर आला. लोकांची ती महत्त्वाची गरज असल्यामुळे उल्काताईंना लोकांचा उत्स्फुर्त सहभाग मिळाला. त्यानंतर संघटनेला लोकांकडे कधी जावे लागले नाही. लोकच संघटनेकडे येवू लागले. प्रश्न निवडताना उल्काताईंची भूमिका स्पष्ट होती, प्रश्न जर लोकांना आपला वाटत असेल आणि जर लोक त्या प्रश्नावर काम करायला तयार असतील तरचं तो प्रश्न निवडायचा. लोकांच्या योग्य प्रश्नाला हात घालणे ही लोकसहभाग मिळवण्याची गुरुकिल्ली आहे असं जाणवलं.

लोक तुकड्या तुकड्यात आयुष्य जगत नसतात. लोकांचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात. म्हणून लोकांना सहभागी करुन घेण्यासाठी त्यांच्या इतर आयुष्यात सुद्धा आपण सहभागी झाले पाहिजे अशी उल्काताईंची भूमिका. (We can’t see a problem in isolation.) ही भूमिका तत्व म्हणून बरोबर आहे. तिच्या व्यावहारिकते बद्दल मत मांडण्याइतपत मला अनुभव नाही.

या भूमिकेतून जमिनीचे प्रश्न, वनहक्काचे प्रश्न, रेशनिंग, दलितांचे प्रश्न, वेठबिगार, वीटभट्टी कामगारांचे प्रश्न इत्यादी शोषणविषयक विविध प्रश्न त्यांनी हाताळले. काही व्यक्तिगत तक्रार निवारणाच्या स्वरुपाचे प्रश्न सुद्धा हाताळले. असे काही प्रश्न हाताळतांना व्यापक परिमाण असलेले प्रश्न त्यांच्या लक्षात आले.

सर्वहाराचं काम जवळपास ७०० गावं आणि वाडयांमध्ये चालतं. विविध गावशिबिरांच्या माध्यमातून संघटना या गांवातील लोकांना संघटनेशी जोडून ठेवते. या गावशिबिरातील विषय आणि सत्र ही गावनिहाय बदलतात. “या शिबिरांची विशेषता म्हणजे ही शिबीर कृतीशील असतात” उल्काताई सांगत होत्या. “जर रेशनिंगच्या

प्रश्नावर शिबिरात पथनाट्य गावकर्यांशनी सादर केलं असेल तर त्या पथनाट्याचाच एक भाग म्हणून गावातील लोक रॅली करुन गावातील रेशनिंग दुकानावर जातात आणि त्या दुकानावरील तक्रार पुस्तकात आपली तक्रार नोंदवतात. अशा लहान-सहान कृती आम्ही शिबीरातच लोकांकडून करवून घेतो.”

उल्काताईंशी बोलतांना जाणवलं की लोकसहभागासाठी ठराविक, साचेबद्ध पद्धती (thumb rules) नसतात. लोकांशी संबधित वस्तुस्थितींचे योग्य आकलन मात्र अत्यंत महत्त्वाचे (अगदी निर्णायक म्हटले तरी चालेल) असते. निव्वळ लोकांशी संवाद साधून, प्रश्न विचारून लोकांच्या खर्या समस्या कळतातच असे नाही. लोकांचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात. ते समजून घेण्यासाठी लोकजीवनात प्रत्यक्ष सहभाग, सहवास आणि सहकृती महत्त्वाचे ठरतात. सुक्ष्म निरीक्षण, आजुबाजूला घडणार्याच विविध घटनांचे अन्वयार्थ, आंतरसंबंध समजून घेणे, विश्लेषण करणे ह्यातूनच खर्यान समस्या कळू शकतात. निर्माण फेलोशीपच्या कार्यशाळेत आनंद करंदीकर सुद्धा म्हणाले होते, डोळ्यांना दिसणारी, वरकरणी खरी वाटणारी वस्तुस्थिती ही सहसा फसवी असते. खरी वस्तुस्थिती गुंतागुंतीची असते. म्हणून आपल्या आकलनाला वारंवार तपासून घेणे गरजेचे असते. ‘मला अतिंम सत्य समजले’ अशी गुर्मी आपल्याला चुकीच्या दिशेने नेते.

रायगड जिल्ह्यातील आठ तालुक्यात त्यांची संघटना काम करते. उल्काताई वगळता संघटनेतील बहुसंख्य कार्यकर्ते स्थानिक आहेत. प्रश्न सोडवतांना ते संघटनेशी जोडले गेले. १३ पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. गावपातळीवर गाव समिती, तालुका पातळीवर गावातील निवडक कार्यकर्त्यांची तालुका समिती, पूर्ण वेळ काम करणारी मुख्य कार्यकारिणी आणि सल्लागार मंडळ अशी संघटनेची रचना आहे. संघटनेशी जोडून घेण्यासाठी लोकांना तिचे सभासद व्हावे लागते. त्यासाठी २५ रुपये वार्षिक वर्गणी भरावी लागते. लोक संघटनेचे भागधारक (shareholder) आहेत. लाभार्थी (beneficiary) नाहीत. लाभार्थीच्या भूमिकेतून लोकांना बाहेर काढले की लोक सक्रिय होतात आणि लोकांचा सहभाग वाढतो असं दिसून आलं. हे अजून तपासून पहावं लागेल.

संघटनेची चिठ्ठी हे एक अजब प्रकरण आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्यावर झालेला अन्याय संघटनेसमोर मांडला तर संघटना समोरच्या पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी म्हणून चिठ्ठी पाठवते. ती व्यक्ती पुढील चर्चेसाठी संघटनेच्या कार्यालयात स्वत: हजर होते. असे ९०% वेळेस घडते. यावरुन संघटना पर्यायाने लोक एक दबाव गट (pressure group) म्हणून यशस्वी ठरत आहेत असे दिसते.

उल्का महाजन या मूळच्या कोल्हापूरच्या. निर्मला निकेतन महाविद्यालयातील समाजकार्य अभ्यासक्रमाच्या सुवर्ण पदक विजेत्या. माणगावात कामाला सुरुवात केली तेव्हा त्या आणि त्यांची एक मैत्रिण अशा दोघीच होत्या. त्यांच्या आधी या भागात कुठल्याही प्रकारचे स्वयंसेवी काम झालेले नव्हते. त्यांना कुठलाही संस्थात्मक आधार सुद्धा नव्हता. सुरुवातीच्या काळात कातकारी लोक वर्षानुवर्षांच्या शोषणातून तयार झालेल्या अविश्वासामुळे त्यांच्याशी बोलायला सुद्धा तयार नसत. घरातनं पाणी सुद्धा मिळायचे नाही. तरीही त्यांनी माघार घेतली नाही.

त्यांच्या कामाच्या संघर्षात्मक पद्धतीमुळे हितसंबंध गुंतलेल्या अनेक बड्या व्यक्तींसोबत त्यांचा संघर्ष होत असतो. पण त्या कधी डगमगल्या नाहीत. त्या करत असलेल्या कामासाठी प्रचंड धैर्य आणि त्यागाची तयारी लागते. ‘मेरा क्या होगा’ हा व्यक्तिगत प्रश्न त्यांना कधी पडला असेल असं वाटत नाही.

स्वातंत्र्योत्तर काळातील चळवळींमधील कार्यकर्त्यांमध्ये विधायक काम की संघर्ष असा पेच असायचा. काही कार्यकर्ते ‘विधायक कामात संघर्ष नसतो असे कुणी सांगितले? आणि संघर्षात्मक काम विधायक असतेच की’ अशी भूमिका घेत. जागतिकीकरणाच्या, ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या आजच्या युगात सामाजिक परिवर्तनाच्या संकल्पना बदलत आहेत. अशा काळात संघर्षात्मक कामाची नेमकी भूमिका काय ह्याचा शोध घ्यायला हवा. एखादी जुनी, कालबाह्य किंवा शोषणावर आधारित व्यवस्था बदलण्यासाठी लोकसंघटनातून संघर्ष आवश्यक ठरतो का? की नवी व्यवस्था इतकी शक्तिशाली आणि क्रांतिकारी असते की जुनी व्यवस्था कालबाह्य ठरुन आपोआप गळून पडते?

रोजगार हमीच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी ‘लोकसंघटनातून संघर्ष’ या कामाच्या पद्धतीतून काही गोष्टी निश्चित घडवून आणता येतील. पण त्या अपूर्याू ठरतील. जोवर रोहयोच्या अंमलबजावणीसाठीच्या व्यवस्थेत काही मूलभूत बदल होत नाही तोवर रोहयोची कार्यक्षमता वाढणार नाही. ज्ञानाचा-तंत्रज्ञानाचा वापर करुन रोहयोची अंमलबजावणीची व्यवस्था कित्येक पटींनी कार्यक्षम करता येणे शक्य आहे. मात्र रोहयोला लोकोपयोगी बनण्यासाठी सामान्य माणसाचा योजनेतील सहभाग वाढलाच पाहिजे. तिथे सुद्धा ज्ञान – तंत्रज्ञानाधारित साधनांचा प्रभावी उपयोग करुन घेता येणे शक्य आहे असे रोहयोच्या अनुभवावरुन मी सांगू शकतो.

वेळेअभावी मनातले अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. त्यांच्यासोबत पुढे चालू राहणार्‍या संवादातून कदाचित उत्तरे सापडतील.

-गोपाल महाजन , सचिन तिवले

Monday, November 23, 2009

प्रतिक्रिया

दि. 17 नोव्हेंबर, 2009 रोजी लोकसत्ता मध्ये प्रकशित झालेल्या ‘ह.भ.प. बबनरावांना ‘मोह’ अनावर !’ या बातमीला प्रतिक्रिया म्हणून लिहलेला हा लेख.


---------------
पोषण नको फक्त व्यसन द्या!!!

पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने आदिवासी भागांमध्ये मोहफुलांपासून दारु निर्मिती करण्याचा घाट घातला आहे. पण यावेळी त्याचं ‘कोलीत’ मात्र बबनराव पाचपुत्यांच्या हातात दिलं आहे. आदिवासी विकासाचं खातं हातात आल्या आल्या त्यांनी मोहफुलांपासून दारू निर्मितीची घोषणा ‘हर्बल लिकर’ या गोंडस नावाखाली नुकतीच जाहीर केली.

यापूर्वीचं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंत्रीमहोदय आत्राम यांनी गडचिरोलीत मोहफुलापासून दारू निर्मितीचा कारखाना काढणार असल्याचं जाहीर केलं होत. पण गडचिरोली जन-आंदोलनाद्वारे दारूमुक्त करणारे डॉ. अभय व डॉ. राणी बंग, सेवानिवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, चंद्रपूरचे माजी खासदार व राज्यामंत्री श्री. शांताराम पोटदुखे, तसेच स्थानिक नेते व बचत गट यांनी केलेल्या जाहीर विरोधामुळे आपण आशा प्रकारच्या कोणत्याचं प्रस्तावाचा विचार करत नसल्याची सारवासारवं शासनाने त्यावेळी केली. कदाचित हातातोंडाशी आलेल्या निवडणुकीच्या काळात ‘जनमता’चा आदर करत असल्याचा धूर्तपणा शासनाने त्यावेळी दाखवला असावा. आता मात्र हे प्रकरण नव्याने डोकं वर काढत आहे.

किमान पाचपुते साहेबांनी आदिवासी विकास खातं हाताला लागल्यानंतर ज्याच्या विकासाचं ‘परमिट’ आपल्याला मिळालय़ं तो आदिवासी कोण, कुठला, काय करतो, कसा जगतो याची माहिती आपलं (की आदिवासींचं) शंभर दिवसांचं ‘टारगेट’ ठरविण्यापूर्वी मिळवायला हवी होती. तसं केलं असतं तर त्यांनी हा निर्णय नक्कीचं घेतला नसता. कारण त्यांना वाटतं त्याप्रमाणे आदिवासी फक्त मोहफुलांपासून दारू काढत नाही, तर आदिवासी मोहफुलांवर आपली भूक भागवतो, मोहफुलं वाळवून साठवूण ठेवतो, आदिवासी बाया मोहफुलांची भाजी बनवतात, मोहफुलांचा भाकरीच्या पीठामध्ये वापर केला जातो. मोहफुलांच्या वापरातून आदिवासींना अनेक पोषणतत्त्वे मिळतात. म्हणूनचं मोहाला आदिवासी मोहामाऊली म्हणतो या गोष्टी त्यांना ज्ञात झाल्या असत्या. एवढचं नव्हे तर मोहाचा संधीवात, बद्धकोष्ठता, मूळव्याध, डोकेदुखी, मधूमेह व स्नायुंवरील ताण कमी करणे या व्याधींवर आयुर्वेदामध्येदेखिल वापर सांगितला आहे.

अशाप्रकारे ‘एक महू, त्याचे गुण बहू’ अशा आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात महत्त्वाचे स्थान असणार्याच मोहच्या फुलांपासून होऊ घातलेल्या दारू निर्मितीच्या कारखान्यामुळे झालेच तर आदिवासींचे नुकसानच होईल. सर्व मोहाची फुलं दारू कारखान्याकडे वळवली जातील. आदिवासी मोहाच्या इतर फायद्यांपासून वंचित होईल. मुळातचं कुपोषित असलेला हा वर्ग अधिक कुपोषित होईल. नंदुरबारसारख्या जिल्ह्यात तर सातपुड्यातील सारं जंगल आपण याअगोदरचं आदिवासींकडून ओरबाडून घेतलं आहे. एकही साग आपण तिथे शिल्लक ठेवलेला नाही. आता तर धार्मिकविधीच्या निमित्ताने आदिवासींनी जपून ठेवलेली मोहाची झाडंदेखिल ‘आम जनता की सरकार’ आदिवासींसाठी ठेवणार नाही. त्याची दारू बनवून ती तिथे आदिवासीच्याच गळी उतरवली जाईल आणि मोठ्या प्रमाणात शहराकडे पाठविली जाईल.

या कारखान्यामुळे मोहाची दारू आदिवासी भागात विपुल प्रमाणात उपलब्ध होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार समाजातील दारुच्या उपलब्धीच्या प्रमाणात समाजातील दारुड्यांची संख्या व व्यसनाचे प्रमाण वाढते. त्यानुसार आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात या कारखान्यांमुळे विनाशाकडे लोटला जाईल. शासनाला जर आदिवासींचा विकास करायचा असेल, त्यांना रोजगार मिळवून द्यायचा असेल तर मोहफुलांतील पोषणमूल्यांवर आधारित उत्पादने बनवण्यासाठी त्यावरील अधिक संशोधनासाठी शासनाने प्रयत्न करावेत. दारू कारखान्यांव्यतिरीक्त इतर उद्योगांना प्रोत्साहन द्यावे.

माजी पंतप्रधान, स्व. इंदिरा गांधी यांनी पुढाकार घेऊन 1975 मध्ये बनविलेल्या केंद्र शासनाच्या ‘आदिवासी भागांसाठी दारूनीती’ या निर्देशांकानुसार देशाच्या कोणत्याच आदिवासी भागामध्ये दारुची निर्मिती किंवा विक्री करु नये. स्व. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1977 मध्ये महाराष्ट्र शासनाने ही नीती स्विकारलेली आहे. असे असताना मोहफुलांपासून दारू बनविण्याचा निर्णय घेऊन बबनरावांनी इंदीरा गाधींची ही नीती सोईस्कररीत्या बासनात बाधून ठेवली आहे.

यापूर्वीच एका ‘रावां’नी द्राक्षापासून वाईन बनवून, ‘वाईन ही दारू नाहीच’ असे महाराष्ट्रातील शाळकरी मुलांपासून ते साठी ओलांडलेल्या नागरीकांना शिकविलेले आहे. आता हे नवे ‘राव’ मोहाची दारू म्हणजे दारू नव्हे हर्बल लिकर आहे असं सांगून महाराष्ट्रातील दहा कोटी जनतेच्या गळी उतरविण्याच्या विकासाच्या योजना आखत आहेत. यापूर्वीच शासनाने धान्यापासून दारू निर्मितीला प्रोत्साहन म्हणून कोट्यावधीं रुपयांची सबसिडी दारू उत्पादकांना वाटण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षातील ही ध्येयधोरण बघता ‘जनतेला धान्य नको, पोषण नको फक्त व्यसन द्या’ ही नीती शासनाने स्विकारली आहे असं दिसत आहे. याउपर तुम्ही मात्र ‘घ्या’ आपण मात्र बिलकुल घेत नाही असं धूर्तपणे सांगायला राव मात्र विसरत नाहीत.

-सचिन

Monday, November 9, 2009

Ecofest 09


7 आणि 8 नोव्हेंबर 2009 ला काही उत्कृष्ट लघु चित्रपट बघण्याची संधी मिळाली. फोलिएज या संस्थेनी आयोजित केलेल्या इकोफेस्ट या पर्यावरण विषयक लघु चित्रपट स्पर्धे निमित्त.
Do You… ?
मोजून 59 सेकंदांचा हा अनुभव. सहज आपल्याला कृतीशील होण्यास उद्युक्त करणारा. जे कळतंय ते वळण्यासाठी काय करायचे असा नेहमीच प्रश्न पडतो. पर्यावरणाच्या अवाढव्य अशा प्रश्ना बद्दल आपल्याला आता माहिती आहे, सगळं कळत आहे पण तरीही वळत नाहिए. तर हे कळल्यापासून कृतीपर्यंत नेण्य़ासाठीचा एक मार्ग या चित्रपटामुळे शिकलो. आणि तो म्हणजे अगदी सहज पणे आपल्याला हृदयाला साद घालणारे भावनिक आव्हान. याला आपले हृदय प्रतिसाद देते आणि आपल्या बुद्धीला, आळसाला आणि प्रश्नाच्या भव्यतेमुळे आलेल्या अगतिकतेला बाजूला सारून मी काहीतरी करणार, मला जे येतं त्यापासून सुरुवात करणार इथपर्यंत पोहोचवते. केवढी ताकत आहे आपल्याच हृदयात.
संयोग मोहिते यांनी केलेल्या या लघु चित्रपटाला पहिले बक्षीस मिळाले.
Vanishing Vultures
तीन दशकांपूर्वी अंदाजे 8.5 कोटी गिधाडे भारतात होती. आता केवळ 3 ते 4 हजार एवढीच यांची संख्या आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात यांची घट कशी काय झाली याबद्दल सांगणारा हा चित्रपट. 2002 साली पेरिग्राइन ट्रस्ट या संस्थेला पाकिस्तानात संशोधन करत असता असे समजले की याचे कारण डायक्लोफिनॅक (diclofenac) हे रसायन. याचा anti-inflammatory परिणाम जनावरांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा जनावराच्या मृत्यु नंतर जर गिधाडांनी याचे भक्षण केले तर त्यामुळे विसेरल गौट (visceral gout) तयार होऊन गिधाड मरण पावते.
2006 मध्ये भारत सरकार ने निर्णय घेतला की जनावरांसाठी वापर करण्यासाठी डायक्लोफिनॅकचा वापर बंद व्हावा. यासाठी पर्याय म्हणून मेलॉक्सिकॅम (meloxicam) नावाचे रसायन वापरले जाऊ शकते. याच बरोबर गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. याची अम्मलबजावणी कशी होते यावर आता गिधाडांचे भवितव्य अवलंबून आहे.
एका रसायनामुळे एक अख्खी प्राणीजातच नष्ट होऊ शकते हे भीषण वास्तव आहे. या बाबतीत आपण त्याचा थेट संबंध लावू शकलो म्हणून त्यावर मार्ग सापडला. अशी किती रसायने आपण वापरतो आणि त्यामुळे कोणत्या प्राण्यावर काय काय परिणाम होत असतील कोणास ठाऊक. सध्या बीटी वांग या विषयावर चर्चा चालू आहे. अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा कशावर कसा परिणाम होईल कोणास ठाऊक? नवीन तंत्रज्ञान कधी आणि कसे स्वीकारायचे हे आजच्या जगासमोरचे कठीण आव्हान आहे.
The Ridley’s Last Stand
ओरिसा मध्ये बंदर बांधण्याविरुद्ध इमेल पेटिशन कदाचित तुम्हाला आले असेल. मलाही आले होते. टाटांच्या या प्रकल्पामुळे रिडली कासवांना धोका आहे एवढेच माहिती होते. पण त्या कासवांची कहाणी कुठे माहित होती.
ओरिसा च्या सागर किना-यावर दर वर्षी एक चमत्कार घडतो. दूर श्रीलंकेच्या दक्षिण भागातून हजारोच्या संख्येनी रिडली कासवे हजरो कोलोमिटरचा प्रवास करत येतात. पाण्यामध्येच मेटिंग करून मादी जमीनीवर अंडी घालायला येते. अंडी घालून निघून जाते. काही दिवसांनी लाखो कासवे अंड्यातून बाहेर येतात आणि पाण्याच्या दिशेनी चालत जातात. मादी अंडी घालताना चे चित्रिकरण शेखर दत्तात्रे यांनी केले आहे. अंड्यातून बाहेर आल्यावर या लहान लहान कासवांच्या सागरात बसून या नैसर्गिक चमत्काराचेही चित्रीकरण फार सुंदर आहे. एक सागर दुस-या सागराला जाऊन भिडतो आहे असा भास होतो.
परंतु मासेमारीमुळे कासवांचे भवितव्य धोक्यात येत आहे. मोठ्या जाळ्याचा उपयोग केल्यामुळे त्यात कासवेही अडकतात व मरण पावतात. Turtle Excluder Device (TED) या उपकरणाचा उपयोग जाळ्यात केला तर कासवे यातून सुटू शकतात. कासवासोबत 5 टक्के माशांनाही सुटका मिळते. परंतु या 5 टक्के तोटाही सहन करण्याची कंत्राटदारांची तयारी नाही. या प्रश्नाचे इतरही पैलू आहेत. जसे की किना-यावार केलेली कॅशुरीना ची लागवड. किनार्‍याचा परिसर जर सपाट नसेल आणि त्यात छोटे आडथळे जरी असले तरी नुकत्याच जन्म झालेल्या कासवांना ते ओलांडून सागरापर्यंत पोहोचता येत नाही. जवळच्या परिसरात दिवे असतील तर पिल्ले दिव्याच्या दिशेनी जातात आणि पाण्यापर्यंत न पोहोचल्यामुळे मरून जातात.
हा प्रश्न सोडवण्यासाठी देखील अनेक नियम बनवले गेले आहेत. पण अम्मलबजावणीतच सगळं गाडं आडतं.
Shores of Silence – Whale Sharks in India
गुजरातच्या किनार्‍यावर व्हेल शार्क हा मासा वर्षातील काही काळ येतो. हा विशाल मासा 35 फूट लांबी पर्यंत वाढू शकतो. एवढा मोठा मासा पण छोटे छोटे प्लँक्टन मासे खाऊन जगतो. या माशाच्या लिव्हर पासून जे तेल मिळते त्याची बाजारात विक्री केली जाते. परदेशात हा मासा खाण्यातही वापरला जातो.
यात सर्वात क्लेशकारक असा प्रसंग म्हणजे या माशाची शिकार करण्याची पद्धत. यासाठी फारच साधी उपकरणे वापरली जातात. एक दोरी, एक आकडा (हुक) आणि दोन हवाबंद प्लॅस्टिक्ची पिंप. हे मासे वरच्या भागत असतात आणि सहज दिसतात. वरच्या थरातल्या गरम पाण्यात आणि उन्हात न्हात बसलेले असतात. मासा दिसला की आधी आकडी टोचतात. आकडीला दोरीनी दोन पिंप लावलेली असतात. आकडी लागताच मासा घाबरून खोल जातो. पण हवाबंद पिंप त्याला सतत वर खेचत राहतात. शेवटी थकून मासा वर येतो. मग त्याच्या शेपटीला दोरीनी बांधून किनार्‍यावर ओढून आणतात आणि मरेपर्यंत वाट बघतात.
हा लघुचित्रपट बनवण्यासाठी या प्रश्नाच्या विविध पैलूंचा माइक पांडे यांनी अभ्यास केला आहे. स्थानिक लोकांसोबत शिकारीला जाऊन, पॅट्रोल बोटीत कोस्ट गार्डच्या लोकांसोबत, मासा मारल्यानंतरची प्रक्रिया, लिव्हर पासून तेल बनवण्याची प्रक्रिया या सर्वाचे चित्रिकरण केले आहे.
2001 साली व्हेल शार्क च्या शिकारीवर बंदी आली. यामुळे रोजगार गमावलेल्यांना हेच व्हेल मासे दाखवून पर्यटनानून रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न चालू आहेत असे नेट वरून समजले.
आयोजना बद्दल
फोलिएज च्या आयोजनही उत्तम होते. कार्यक्रम वेळेत सुरू झाला. मुळात अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करणे हीच एक उत्तम कल्पना आहे. पर्यावरणाबद्दल काम करत याची व्यवहारीक बाजू कशी सांभाळतात हे समजून घ्यावे लागेल. स्पर्धेतील चित्रपटांची सीडी बनवून ती कागदाच्या पिशवीत सर्वांना दिली. कार्यक्रमादरम्यान चहा कॉफी नव्हती :) त्यामुळेही भरपूर प्लॅस्टिक कप वाचले असतील. आपल्याला कधी उगीचच चहा कॉफी प्यायची सवय लागली आहे.
पडलेले प्रश्न
1. या सर्वच प्रश्नांच्या बाबतीत असे जाणवले की पर्यावराबद्दल जागृत असलेले लोक भरपूर प्रयत्न करून, सरकार वर दबाव आणून नियम बदलून घेतात. यात भरपूर वेळ, परिश्रम घ्यावा लागतो.  त्यानंतर जी सक्त अम्मलबजावणी करावी लागते त्यावर मात्र आपले काही नियंत्रण नाही. इतर सर्वत्र जाणवते ती कमजोर कडी इथेही जाणवते.
2. पर्यावरणाच्या प्रश्नांशी जेव्हा स्थानिक लोकांचे पोट अवलंबून असते तेव्हा काय करायचे? याला पर्याय शोधावाच लागतो आणि तो सापडतोच असे नाही.
3. आपल्या जीवशैलीचा पर्यावरणाच्या हानीशी आपण थेट संबंध लावू शकत नाही आणि म्हणून मला समजतही नाही की मी काय करू. जसे की व्हेल शार्क वाचवण्यासाठी मी काय करू? या प्रश्नांशी थेट संबंध लावता आले पाहिजे.  
या निमित्तानी Wild Life संबंधित डॉक्युमेंट्री हे नवीन विश्व उघडले. त्यात किती परिश्रम घ्यावे लागतात. माइक पांडे यांनी व्हेल्स वर 3 वर्ष डॉक्युमेंट्री बनवत होते. आणखीन म्हणजे खूप लोक या विषयी संवेदनशील आहेत. हे सगळे एकत्रित कसे आणायचे या दिशेनीही प्रयत्न केले पाहिजेत.   

-प्रियदर्शन

Wednesday, November 4, 2009

पडसाद

काल सायंकाळी मेधातांईना प्रत्यक्ष ऐकायला मिळालं. निमित्त होतं The Word’s First Anti-Dam Movement या प्राध्यापक वोरा लिखित पुस्तकावर फर्ग्युसन कॉलेजच्या राजशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या चर्चेचं. ‘धरण, धरणग्रस्तांचे प्रश्न आणि त्यासंदर्भातील चळवळी काही आपल्याला नवीन नाहीत’ कार्यक्रमाच्या सुरवातीला सुहास पळशीकर सांगत होते. जगामध्ये अशा प्रकारच्या चळवळी विविध स्तरावर चालू आहेत. पण जगात प्रथमचं अशा प्रकारच्या चळवळींची सुरुवात पुण्याच्या मुळशी धरणापासून सुरु झाली. त्यापूर्वी धरणग्रस्तांच्या तक्रारी होत्या पण धरणग्रस्तांनी संघटीतरीत्या आपली राजकीय भूमिका मांडणारा लढा प्रदीर्घ काळ लढल्याची नोंद इतिहासात नाही. हा मुळशीचा लढा लढला गेला होता १९२१ ते १९२४ च्या कालवधीत टाटा उद्योगसमूहाच्या विरुद्ध. त्याचं नेतृत्व केलं होतं सेनापती बापटांनी.

या लढ्याला गांधी समुदायाने फारसा पाठिंबा दिला नव्हता, परंतु गांधीजींनी मुळशी प्रकल्पाचं समर्थनसुद्धा केलं नव्हतं. लोक़ांच्या विरुद्ध भूमी संपादन करुन असे प्रकल्प उभे करणं याला गांधीजींचा विरोध होता.

मेधाताईंनी मुळशीचा लढा, नर्मदा बचावं आंदोलन, अशा जनाआंदोलनांच स्वरूप आणि त्यांचे परिणाम याची आपल्या भाषणातून अतिशय सुंदर मांडणी केली. मुळशीच्या आंदोलनाच्या माध्यमातून जरी मावळ प्रांतातले शेतकरी जरी टाटांना या प्रकल्पापासून परावृत करु शकले नसले तरी ते आंदोलन अयशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. “कोणतही जनाआंदोलन हे यशस्वी की अयशस्वी असं सरळ सरळ मोजता येत नाही.” मेधाताई सांगत होत्या. जनाआंदोलनातून समाजाला एक नवीन विचार मिळतो, तो व्यापक असतो आणि त्यातून राज्यसंस्थेची सुद्धा घडण होतं असते.

मुळशीच्या निमित्ताने काही मुद्दे समोर आले. राष्ट्रीय सुरक्षितता धोक्यात असताना किंवा राष्ट्रावर एखादी नैसर्गिक आपत्ती आली असताना राष्ट्र लोकांकडून कोणत्याही गोष्टींची मागणी करू शकते पण मुळशीच्या संदर्भात असं काहीचं नसताना सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या जमिनी कशाच्या आधारावर बळकवल्या जाऊ शकतात. शेती, शेतकरी आणि त्यावर आधारलेली अर्थव्यवस्था कि धरण, उद्योगधंद्यांना लागणारी वीज, त्यातून एका विशिष्ट वर्गाला होणारा फायदा यापैकी काय महत्वाचं आहे असे प्रश्न पहिल्यांदा उपस्थित केले गेले.

मुळशी नंतर सुरु झालेल्या आणि अगदी आतापर्यंतच्या नर्मदा बचाव आंदोलनापर्यंतच्या गेल्या काही वर्षातील चळवळींकडे पाहता, धरणग्रस्तांनी व त्यासंदर्भात काम करणार्‍या चळवळींनी फक्त आमच्या पुनर्वसनाचे काय? हा एकमेव प्रश्न उपस्थित केला नाही तर अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून धरणं खरीच “फायद्याची” ठरत आहेत का? धरणांमुळे दुष्काळाचा प्रश्न खरचं सुटतो का?. पर्यावरणाच्या दृष्टीने धरणांचं स्थान काय? इथून ते विकासाची खरी व्याख्या काय असावी? विकासाचं नवं ‘मॉडेल’ कसं असावं? विकास प्रक्रियेत लोकसहभाग किती व कसा असावा? सामाजिक संपात्तिचा वापर, पुनर्वापर व त्याच न्याय पद्धतीने समवाटप कस असावं? ते पैशाच्या बळावर वाढलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बेसुमार वापर करुन रुजू पाहणार्‍या उपभोग्तावादावर नियंत्रण असावे का? असे मूलभूत प्रश्न उपस्थित केले. या चळवळींनी यापैकी काही प्रश्नांवर अभ्यास केला आणि विकासाचे पर्यायी मार्गसुद्धा काही बाबतीत सुचवले. या पुस्तक चर्चेच्या निमित्ताने मेधाताईंनी या मुद्यांवर त्यांच्या ‘खास’ शैलीत विस्तृतपणे बोलल्या.

असं असतानादेखिल नंदीग्राम, सिंगुर, एसईझेड हे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही तितकेच तीव्रतेने आपल्यासमोर आहेत. माओवाद्यांचे प्रश्न जे अप्रत्यक्षपणे या प्रश्नांशी निगडीत आहेत. वेगवेगळ्या उद्देशांसाठी, वेगळ्या मार्गांनी होणार्‍या भूसंपादनातून निर्माण होणारे प्रश्न. हे प्रश्न आजही पुरेश्या सहृदयतेने हाताळले जात नाहीत. हे कदाचित उद्योजकांचे वाढते प्रस्थ, नोकरशाही आणि स्वार्थी राजकारणी यांमुळे घडत असावं. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचा या प्रश्नांमध्ये सहभाग व त्यांची कृती अधिक महत्त्वाची आहे याची जाणीव झाली.

या महिन्याच्या सुरवातीला उल्का महाजन आणि सर्वहारा जनआंदोलनाची कामे पाहिल्यानंतर, गेल्या आठवड्याभरात बीटी वांग्याबद्दल झालेली चर्चा व त्याला विविध माध्यमातून व स्तरातून जनतेने केलेला विरोध बघितल्यानंतर जनाआंदोलनाचं महत्त्व पुन्हा एकदा माझ्या प्रत्ययास आलं.

खरं काय हे एकदा माहीत झाल्यानंतर आणि ते सरळ सरळ विवेकबुद्धिला पटत असताना देखिल काही विशिष्ट गटाच्या/ वर्गाच्या हितसंबधापोटी जर त्या गोष्टी प्रत्यक्षात येत नसतील तर अशावेळी सर्वसामांन्याची भूमिका महत्त्वाची ठरते. निवडणुकांव्यतिरीक्त ‘आम’ जनतेला विविध मुद्द्यांवर आपली मतं दखल घेतली जातील अशा पद्धतीने मांडण्यासाठी व व्यक्तिगत वा लहान गटांमधून कृती करता येईल अशी व्यासपीठं किंवा संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज आहे.

असं घडून आल्यानंतरच विवेक सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे बदल घडून येण्याच्या प्रक्रियेतील ज्या Information, Interaction, Transaction आणि Transformation या चार पायर्‍या आहेत, त्यातील Interaction आणि Transaction या पायर्‍यांना गती मिळेल.


-सचिन

Monday, November 2, 2009

लहानपण देगा देवा


रात्री दहाच्या सुमारास अर्पिताला फोन केला. अनेक दिवसांनी तिच्याशी बोलत होतो. सहज बोलता बोलता जीवनाच्या निरर्थकतेविषया बोलणे चालू झाले. नुकतेच माझ्या आजीशी बोलत असताना मी तिला विचारलं की हे शरीर जर निरर्थक असेल, आत्मा जुन्या कपड्यांसारखा जर ते बदलत असेल तर मग लागतेच कशाला शरीर. आपण सर्व आत्मेच का नसतो? तेव्हा तिनी मला शंकराचा-यांची गोष्ट सांगितली. शंकराचार्य या भौतिक जगाला माया म्हणत. एकदा रस्त्यातून जात असता त्यांच्या मागे एक हत्ती लागला. तो जवळ आला अन् शंकराचार्यांनी धूम ठोकली. हे बघत असलेल्या त्यांच्या मित्रानी त्यांना बरोबर विचारले की हा हत्ती जर माया असेल तर मग तुम्ही का पळालात. तेव्हा शंकराचार्य म्हणाले, की हा हत्ती माया आहेच आणि मी पळालो ती देखील माया होती. अर्पिता आणि मी पाच एक मिनिटे फोन वर हसत होतो. कितीतरी दिवसांनी मी इतका हसलो.

आता झोपावे अशा विचारात होतो आणि जवळच्या मार्केटयार्ड मधल्या गणपती मंदिरातून भजनाचे स्वर आले. घरापासून या मंदिराचे हवेतील अंतर अंदाजे 500 मीटर असेल. मंदिराच्या वरच्या भागात 4 भोंगे लावले आहेत. तिथून थेट आवाज आमच्या सोसायटीत येतो. घरात जो आवाज येतो त्याचा त्रास होतो. हे गाणे अनेकदा बेसूर असते. शब्द तर समजत नाहीतच. तेव्हा रात्रीचे 10:30 वाजले होते. पहिल्यांदा 100 वर फोन केला. नेहमीप्रमाणेच गाडी पाठवतो असे उत्तर मिळाले. गाडी जाणार नाही हे अनुभवातून माहित होते. तरीही फोने केलाच पाहिजे, किमान त्याची नोंद तरी होते या विचाराने मी नेहमी 100 वर फोन करतो.

खाली उतरलो आणि माझी आत्या, शांति आत्या अपेक्षेप्रमाणे त्रस्त होतीच. तिल म्हटलो की आपण जऊन बघू. तिथे पोचल्यावर अपेक्षित चित्र दिसले. काही लोक मंदिरात भजन करत होते. त्या व्यतीरिक्त इतर कोणीही तिथे ऐकायला नव्हते. बाहेर काही लोकांशी बोलायला सुरुवात केली. बोलता बोलता नहेमीच येतात ते वाद प्रत्यवाद चालू झाले. मस्जिदीतून बांग येते ती मात्र तुम्हाला चालते. हिंदू धर्माचे मात्र चालत नाही. ते तुम्ही थांबवून दाखवा मग आमी हे थांबवतो. आता विचार करतो ते गांधींचे 'An eye for an eye makes the whole world blind' आठवते. अम्हाला मंदिरातूनच दोन लोकांचे नंबर मिळाले होते, त्यापैकी मोहोळ सर यांना फोन लावला. यांच्याशी मी आधीही बोललो आहे. मोहोळ सर हे आमचे नेहमी शांत पणे ऐकून घेतात. त्यांच्यावरच सगळा राग काढायला सुरुवात केली. ऐकतायत तर घ्या ओरडून. त्यांच्याशी बोलत असता समजले की त्यांच्या हातातही काही नाही. मग तो प्रयत्न सोडून दिला. बरेच वाद घालून झाल्यावर त्यांनी माइक काढला. भजन चालूच होते आणि भजन चालू असण्याबद्दल आमचा काहीच आक्षेप नव्हता. ते माइक लावून लाऊडस्पीकर वर प्रक्षेपित करण्याबद्दल आक्षेप होता. तरीही मी आणि आत्या समोरच्या पार-यांवर बसलो. मी आत्याला विचारले की त्यांनी माइक तर बंद केलाय आता आपण इथे का बसतोय. आत्या म्हणाली निषेध म्हणून. मग काही लोक म्हणाले की इथे     पाय-यांवर नका बसू, आत जावून बसा. मग आम्ही आत गेलो.

या सर्वात माझ्या हृदयाची गती वाढली होती. कशामुळे कुणासठावूक. इतक्या लोकांसमोर वाद घालण्याचा हा तसा पहिलाच अनुभव होता. मध्ये एकानी माझा हात धरून ढकलले ही होते. कदाचित भितीही वाटत असेल. तेवढ्यात कोणी येऊन चला चला भजन सुरू करा असे सांगितले. त्या भजन मंडळीला वाटले की मलाच गायचे आहे. मला फार मोह होत होता गायचा. विठ्ठलाचे भजन. मी आत्याकडे बघितले, ती म्हटली नाही गाता येत असे सांग. शांतपणे डोळे मिटळे, मांडी घातली आणि त्यांनी भजन सुरू केले.



लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥३॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥४॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥५॥



आत्मीयतेने आणि भक्तीभावाने गात होते. मनापासून. 

ऐकून शांत वाटायला लागले. हृदयाची गती परत स्थिरावली. घरी परतून आधी मोहोळ सरांना फोन लावला. घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. रागाच्या भरात काही उलट सुलट बोललो असेन तर क्षमा मागितली. त्यांनीही आम्हाला रोज त्रास होतो याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण त्यांचेही तिथे काही चालत नाही हे यावरून जाणवले.   दुस-याला समजून घेणे, जरा आवाज चढवला की ऐकून घेणे ही सज्जनाची लक्षणे त्यांच्यातही होती. आम्ही दोघेही एकाच बोटीत होतो.

दुस-या दिवशीही सकाळी 5:30 वाजता काकड आरती चालू झाली. सकाळी योगासन अभ्यासासाठी उठणे हे फार कठीण. पण उठल्या उठल्या या भजनांचे स्वर पडले की असे काही तरी वाटते की परत झोपच येत नाही. कधी विचार येतो की बरंच आहे. त्यानिमित्तानी रोज उठीन तरी. आणि योगासन वर्गात गेलो की सुटलो. आवाजही नाही आणि योगअभ्यासही होतो. दुहेरी लाभ. अडचणीचे रूपांतर संधीत. उठून 5.45 च्या सुमारास परत 100 वर फोन लावला. त्या व्यक्तीशी गप्पा मारल्या. की हा त्रास रोज होतो पण तुम्ही काहीच का करत नाही. त्यांनी सांगितले की पोलिस जाऊन येतात. थोडा वेळ आवाज बंद होतो पण मग परत सुरू होतो. अनेकदा वरून दबाव येतो. याची मला अपेक्षाच नव्हती. आता काय करणार?

काहीच सुचेना. येवून तंबोरा लावला आणि चादर डोक्यावर घेऊन परत झोपलो. योगासन वर्ग गेला खड्ड्यात.

आता हळू हळू समजते, मोठ्या माणसांमध्ये इतका निराशेचा सूर का असतो ते. बाबा नेहमी मला सांगतात, की कायदा कडक केल्याशिवाय  काहीच होणार नाही. डॉ राणी व अभय बंग यांच्या निर्माण उपक्रमात आम्ही विद्यार्थी आहोत. काही वेगळे करूयात, आपल्याभोवतालच्या परीस्थितीत काही चांगला बदल घडवण्यासाठी योगदान देत आपले आयुष्य जगूयात असे स्वप्न बघतो आहोत. आणि अशा लहानशाच प्रसंगातून परीस्थितीचे असे काही निराश विश्वरूप दर्शन घडते की काही समजेनासे होते. (विश्वरूप दर्शन वगैरे सगळे गीता थोडी थोडी वाचायला लागलोय म्हणून). क्षूद्रपणाची जाणीवच नाही तर सिद्धी होते, लहानपण मागावे लागत नाही.

अचानक, आधी वाचलेले गांधीजी थोडे थोडे समजत आहेत. अहिंसेचा स्वीकार करून इंग्रजांचा मारा सहन करणा-यांच्या जिद्दीचा अर्थ समजत आहे. अंधळ्या माणसाला रंग म्हणजे काय हे जसे समजू शकत नाही तसे या कल्पनांबद्दल मी आंधळाच होतो. 



दलाई लामा आणि तिबेट बद्दल कुंडुन नावाचा चित्रपट बघितला. त्यात तिबेट वर चीननी केलेक्या आक्रमणाचे वर्णन आहे. द्लाई लामांना तिबेट सोडून भारतात यावे लागले. 1959 सालापासून यांचा संघर्ष अहिंसक मार्गाने चालू आहे. कार्यरत पुस्तकात कर्नाटकातील चळवळीबद्दल लिहिले आहे. तिथे एका फॅक्टरीमुळे नदी आणि हवेचे प्रदूषण झालेले आहे. प्रत्येक श्वासागणिक लोकांना त्रास होतो आहे. इतर कितीतरी लोकांचे केवढे तरी तीव्र प्रश्न आहेत आणि आपण या छोट्याश्या त्रासाला का एवढे महत्त्व देतो. पण यावर एकच उत्तर सापडले आहे. की मोठा प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य काही आपल्यात नाही. जे आपल्या आवाक्यात आहे ते तरी करावे. 

सकाळी परत मंदिरात गेलो. मोहोळ सरांना भेटलो. सकाळपासून चाललेली आरती संपली होती व भोजन चालू होते. मोहोळ सर लोकांना वाढण्यात मग्न होते. गणेश घुले हे तिकडचे अध्यक्ष यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार या मुळे धर्माचा प्रसार होतो. मला विचारले की धर्माच्या प्रसारासाठी मी काय करतो? मग त्यांनी त्यांच्या नेत्यांशी बोलायला सांगितले. प्रवीण चोरबेले. त्यांना समजवायचा प्रयत्न केला की आमचे घर लांब आहे तरीही तिथे थेट आवाज येतो. त्यांनी सांगितले, की तुम्ही दारे खिडक्या बंद करून बसा. कानात कापूस घालून बसा. आणि परत इथे येऊन त्रास देऊ नका. तुमच्या विरुद्ध पोलिस कम्पेंट करू. मग माझे नाव आणि फोन नं लिहून घेतला. मी ही त्यांचे नाव आणि फोन लिहून घेतला. आता काय करायचे याचा विचार चालू आहे. तुम्हाला काही सुचतेय?

-प्रियदर्शन