Sunday, September 19, 2010

पर्यावरणीय गणेश उत्सव

गणेश उत्सवातील वाढते प्रदुषण आपल्याला नवीन नाही! पाण्याचं, नद्यांचं, प्रदुषण, ध्वनी प्रदुषण, प्लास्टिक, थर्मोकोल यामुळे हवेचं प्रदुषण ... अनेक प्रकार! मात्र काही वर्षांपासून हे प्रदुषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार्यांची संख्याही वाढतीये! अनेक ठिकाणी अनेक संस्था - संघटना, वेगवेगळे गट आणि महापालिकाही विविध पातळ्यांवर हे प्रयत्न करत असतात.  त्यात मातीच्या गणपतीच्या मूर्ती बनवणे, पर्यावाराणीय आरास, मूर्तीदान, निर्माल्य दान आशा गोष्टींचासमावेश असतो. नाशिकमध्ये गोवर्धन - गंगापुर गावातले काही गावकरी आणि निर्मल ग्राम निर्माण केंद्र गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणीय गणेश उत्सव साजरा करतो. गेल्या वर्षी इतर काही गटांकडून प्रेरणा मिळाली आणि निर्माल्य दान अभियानाही घेतलं.

या सगळ्या उपक्रमांमधले काही अनुभव.
मातीच्या मूर्ती

7-8 वर्षांपासून गोवर्धन गावातली काही मुलं मातीच्या गणेश  मूर्ती बनवतात.  निर्मल ग्राम निर्माण केंद्रात ही कार्यशाळा होते. नंतर सर्वजण आपापल्या मूर्ती घरी नेऊन बसवतात. पूर्वी हे गणपती शाडूच्या मातीचे बनवायचो. मात्र तिला काही स्थानिक पर्याय शोधावा असा विचार आला. मग शेतातली काळी माती आणि शेण एकत्र भिजवून, मळून त्यापासून मूर्ती बनवू लागलो. ते साध्या पोस्टर कलर्सने रंगवतो. जसजसा सराव झाला तसा मुलांच्या मूर्तींचा आकार वाढू लागला, मूर्ती अधिक सुबक, देखण्या होऊ लागल्या. शिवाय स्वत: बनवलेला गणपती घरी आणून बसवण्यातला आनंद  वेगळाच !

पर्यावरणीय विसर्जन

गावात ज्यांच्या मूर्ती मातीच्या आहेत असे बहुतेक सर्वजण अनंत चतुर्दशीला विसर्जनासाठी एकत्र येतात,  गणपतीच्या मूर्तींचे  मोठ्या ड्रममध्ये विसर्जन करतात. जिथून मूर्ती बनवण्यासाठी माती घेतली तिथेच ती पुन्हा मिळते !

निर्माल्य दान अभियान

निर्मल ग्रामकडे येणारा रस्ता पुढे गंगापुर धरणाकडे जातो. रस्त्यात नदीवर एक पूल आहे. नाशिक शहरातली अनेक गणेश मंडळे, कुटुंबं गणपती विसर्जनासाठी येतात. मूर्तींसोबत १० दिवसांचे निर्माल्यही नदीत सोडतात! गेल्या वर्षी आम्ही सर्व रस्त्यावर थांबलो आणि येणार्‍या गाड्यांना आडवून लोकांना निर्माल्य आमच्याकडे देण्याचे आवाहन केले. खूप छान प्रतिसाद मिळाला 'निर्माल्य नदीत टाकून नदीचे व निर्माल्याचेही पावित्र्य कमी करू नका, आपले निर्माल्य वृक्षदेवतेच्या चरणी अर्पण करण्यासाठी दान करा' असे भावनिक आवाहन करणारी पोस्टर्सही लावली होती.  आम्ही फक्त  तीन - साडेतीन  तास हे काम केलं पण प्रचंड निर्माल्य जमा झालं.

 हा कार्यक्रम खूप ऐनवेळी घेतला. त्यामुळे निर्माल्याचें लगेच वर्गीकरण करणे शाक्य झाले नाही. या सर्व निर्माल्याचे ख़त करायचे होते, पण दुसर्या दिवशी जेव्हा त्याचं वर्गीकरण केलं तेव्हा त्यात काय काय निघालं ?

 १. पानं, फुलं, दूर्वा इ.  - ३०० किलो.
 २. नेवैद्य / प्रसाद        - २० किलो
 ३. नारळे                   - ३९
 ४. खोबर्‍याच्या वाट्या - ३०
 ५. धान्य                   - २ किलो
 ६.  फळे                    - १५ किलो
 ७. वस्त्रे                    - ४५
 ८. प्लास्टिक             - २५ किलो
 ९. देवांचे फोटो   
१०. मातीचे बैल
११. मूर्ती
१२. कापराच्या डब्या, अत्ताराच्या बाटल्या, वातींचे पुड़े, कात्री, चाकू, टूथब्रश 


ही यादी पाहिली आणि आपण किती बेजबाबदारपणे या सर्व गोष्टी नदीत टाकतो, याचा प्रत्यय आला !! आपल्याकड़े धान्याचा तुटवडा असताना, आपण खाऊ शकू आशा वास्तु,  ताजी फळं हे सगळं सरळ नदीत टाकतो? आपल्या धार्मिक संकल्पना काय आहेत? असे प्रश्नही पडले! आणि एवढा तरी कचरा आपण नदीत जाण्यापासून वाचवला याचं सगळ्यांनाच खूप समाधान वाटलं !

यंदा हे अभियान अधिक मोठ्या स्तरावर घ्यायचे आहे. आपण सगळेच यात सहभागी होऊ शकतो, आपापल्या भागात अशी अभियानं राबवू शकतो. बर्याच ठिकाणी मूर्ती दानाचेही उपक्रम राबवले जातात. त्यांच्यात सहभागी होऊ शकतो. नदी वाचवणं हे  आपलं सगळ्यांचं  काम आहे !!

-मुक्ता नावरेकर, 
निर्मल ग्राम निर्माण केंद्र, 
नाशिक 
muktasn1@gmail.com

3 comments:

Bhram said...

Atishay stutya upakram.
Tumachya sarva team cha abhinandan.

sonu said...

lai bhari muktaa
an am extremely sorry that mi ha lekh aaj vachala.
mi nakkich aadhi kabitari karu shakalo asto.
continue the work.

AMIT GONDANE said...

upkram avadla continue