Monday, November 23, 2009

प्रतिक्रिया

दि. 17 नोव्हेंबर, 2009 रोजी लोकसत्ता मध्ये प्रकशित झालेल्या ‘ह.भ.प. बबनरावांना ‘मोह’ अनावर !’ या बातमीला प्रतिक्रिया म्हणून लिहलेला हा लेख.


---------------
पोषण नको फक्त व्यसन द्या!!!

पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारने आदिवासी भागांमध्ये मोहफुलांपासून दारु निर्मिती करण्याचा घाट घातला आहे. पण यावेळी त्याचं ‘कोलीत’ मात्र बबनराव पाचपुत्यांच्या हातात दिलं आहे. आदिवासी विकासाचं खातं हातात आल्या आल्या त्यांनी मोहफुलांपासून दारू निर्मितीची घोषणा ‘हर्बल लिकर’ या गोंडस नावाखाली नुकतीच जाहीर केली.

यापूर्वीचं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मंत्रीमहोदय आत्राम यांनी गडचिरोलीत मोहफुलापासून दारू निर्मितीचा कारखाना काढणार असल्याचं जाहीर केलं होत. पण गडचिरोली जन-आंदोलनाद्वारे दारूमुक्त करणारे डॉ. अभय व डॉ. राणी बंग, सेवानिवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, चंद्रपूरचे माजी खासदार व राज्यामंत्री श्री. शांताराम पोटदुखे, तसेच स्थानिक नेते व बचत गट यांनी केलेल्या जाहीर विरोधामुळे आपण आशा प्रकारच्या कोणत्याचं प्रस्तावाचा विचार करत नसल्याची सारवासारवं शासनाने त्यावेळी केली. कदाचित हातातोंडाशी आलेल्या निवडणुकीच्या काळात ‘जनमता’चा आदर करत असल्याचा धूर्तपणा शासनाने त्यावेळी दाखवला असावा. आता मात्र हे प्रकरण नव्याने डोकं वर काढत आहे.

किमान पाचपुते साहेबांनी आदिवासी विकास खातं हाताला लागल्यानंतर ज्याच्या विकासाचं ‘परमिट’ आपल्याला मिळालय़ं तो आदिवासी कोण, कुठला, काय करतो, कसा जगतो याची माहिती आपलं (की आदिवासींचं) शंभर दिवसांचं ‘टारगेट’ ठरविण्यापूर्वी मिळवायला हवी होती. तसं केलं असतं तर त्यांनी हा निर्णय नक्कीचं घेतला नसता. कारण त्यांना वाटतं त्याप्रमाणे आदिवासी फक्त मोहफुलांपासून दारू काढत नाही, तर आदिवासी मोहफुलांवर आपली भूक भागवतो, मोहफुलं वाळवून साठवूण ठेवतो, आदिवासी बाया मोहफुलांची भाजी बनवतात, मोहफुलांचा भाकरीच्या पीठामध्ये वापर केला जातो. मोहफुलांच्या वापरातून आदिवासींना अनेक पोषणतत्त्वे मिळतात. म्हणूनचं मोहाला आदिवासी मोहामाऊली म्हणतो या गोष्टी त्यांना ज्ञात झाल्या असत्या. एवढचं नव्हे तर मोहाचा संधीवात, बद्धकोष्ठता, मूळव्याध, डोकेदुखी, मधूमेह व स्नायुंवरील ताण कमी करणे या व्याधींवर आयुर्वेदामध्येदेखिल वापर सांगितला आहे.

अशाप्रकारे ‘एक महू, त्याचे गुण बहू’ अशा आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनात महत्त्वाचे स्थान असणार्याच मोहच्या फुलांपासून होऊ घातलेल्या दारू निर्मितीच्या कारखान्यामुळे झालेच तर आदिवासींचे नुकसानच होईल. सर्व मोहाची फुलं दारू कारखान्याकडे वळवली जातील. आदिवासी मोहाच्या इतर फायद्यांपासून वंचित होईल. मुळातचं कुपोषित असलेला हा वर्ग अधिक कुपोषित होईल. नंदुरबारसारख्या जिल्ह्यात तर सातपुड्यातील सारं जंगल आपण याअगोदरचं आदिवासींकडून ओरबाडून घेतलं आहे. एकही साग आपण तिथे शिल्लक ठेवलेला नाही. आता तर धार्मिकविधीच्या निमित्ताने आदिवासींनी जपून ठेवलेली मोहाची झाडंदेखिल ‘आम जनता की सरकार’ आदिवासींसाठी ठेवणार नाही. त्याची दारू बनवून ती तिथे आदिवासीच्याच गळी उतरवली जाईल आणि मोठ्या प्रमाणात शहराकडे पाठविली जाईल.

या कारखान्यामुळे मोहाची दारू आदिवासी भागात विपुल प्रमाणात उपलब्ध होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार समाजातील दारुच्या उपलब्धीच्या प्रमाणात समाजातील दारुड्यांची संख्या व व्यसनाचे प्रमाण वाढते. त्यानुसार आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात या कारखान्यांमुळे विनाशाकडे लोटला जाईल. शासनाला जर आदिवासींचा विकास करायचा असेल, त्यांना रोजगार मिळवून द्यायचा असेल तर मोहफुलांतील पोषणमूल्यांवर आधारित उत्पादने बनवण्यासाठी त्यावरील अधिक संशोधनासाठी शासनाने प्रयत्न करावेत. दारू कारखान्यांव्यतिरीक्त इतर उद्योगांना प्रोत्साहन द्यावे.

माजी पंतप्रधान, स्व. इंदिरा गांधी यांनी पुढाकार घेऊन 1975 मध्ये बनविलेल्या केंद्र शासनाच्या ‘आदिवासी भागांसाठी दारूनीती’ या निर्देशांकानुसार देशाच्या कोणत्याच आदिवासी भागामध्ये दारुची निर्मिती किंवा विक्री करु नये. स्व. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना 1977 मध्ये महाराष्ट्र शासनाने ही नीती स्विकारलेली आहे. असे असताना मोहफुलांपासून दारू बनविण्याचा निर्णय घेऊन बबनरावांनी इंदीरा गाधींची ही नीती सोईस्कररीत्या बासनात बाधून ठेवली आहे.

यापूर्वीच एका ‘रावां’नी द्राक्षापासून वाईन बनवून, ‘वाईन ही दारू नाहीच’ असे महाराष्ट्रातील शाळकरी मुलांपासून ते साठी ओलांडलेल्या नागरीकांना शिकविलेले आहे. आता हे नवे ‘राव’ मोहाची दारू म्हणजे दारू नव्हे हर्बल लिकर आहे असं सांगून महाराष्ट्रातील दहा कोटी जनतेच्या गळी उतरविण्याच्या विकासाच्या योजना आखत आहेत. यापूर्वीच शासनाने धान्यापासून दारू निर्मितीला प्रोत्साहन म्हणून कोट्यावधीं रुपयांची सबसिडी दारू उत्पादकांना वाटण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षातील ही ध्येयधोरण बघता ‘जनतेला धान्य नको, पोषण नको फक्त व्यसन द्या’ ही नीती शासनाने स्विकारली आहे असं दिसत आहे. याउपर तुम्ही मात्र ‘घ्या’ आपण मात्र बिलकुल घेत नाही असं धूर्तपणे सांगायला राव मात्र विसरत नाहीत.

-सचिन

Monday, November 9, 2009

Ecofest 09


7 आणि 8 नोव्हेंबर 2009 ला काही उत्कृष्ट लघु चित्रपट बघण्याची संधी मिळाली. फोलिएज या संस्थेनी आयोजित केलेल्या इकोफेस्ट या पर्यावरण विषयक लघु चित्रपट स्पर्धे निमित्त.
Do You… ?
मोजून 59 सेकंदांचा हा अनुभव. सहज आपल्याला कृतीशील होण्यास उद्युक्त करणारा. जे कळतंय ते वळण्यासाठी काय करायचे असा नेहमीच प्रश्न पडतो. पर्यावरणाच्या अवाढव्य अशा प्रश्ना बद्दल आपल्याला आता माहिती आहे, सगळं कळत आहे पण तरीही वळत नाहिए. तर हे कळल्यापासून कृतीपर्यंत नेण्य़ासाठीचा एक मार्ग या चित्रपटामुळे शिकलो. आणि तो म्हणजे अगदी सहज पणे आपल्याला हृदयाला साद घालणारे भावनिक आव्हान. याला आपले हृदय प्रतिसाद देते आणि आपल्या बुद्धीला, आळसाला आणि प्रश्नाच्या भव्यतेमुळे आलेल्या अगतिकतेला बाजूला सारून मी काहीतरी करणार, मला जे येतं त्यापासून सुरुवात करणार इथपर्यंत पोहोचवते. केवढी ताकत आहे आपल्याच हृदयात.
संयोग मोहिते यांनी केलेल्या या लघु चित्रपटाला पहिले बक्षीस मिळाले.
Vanishing Vultures
तीन दशकांपूर्वी अंदाजे 8.5 कोटी गिधाडे भारतात होती. आता केवळ 3 ते 4 हजार एवढीच यांची संख्या आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात यांची घट कशी काय झाली याबद्दल सांगणारा हा चित्रपट. 2002 साली पेरिग्राइन ट्रस्ट या संस्थेला पाकिस्तानात संशोधन करत असता असे समजले की याचे कारण डायक्लोफिनॅक (diclofenac) हे रसायन. याचा anti-inflammatory परिणाम जनावरांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. अशा जनावराच्या मृत्यु नंतर जर गिधाडांनी याचे भक्षण केले तर त्यामुळे विसेरल गौट (visceral gout) तयार होऊन गिधाड मरण पावते.
2006 मध्ये भारत सरकार ने निर्णय घेतला की जनावरांसाठी वापर करण्यासाठी डायक्लोफिनॅकचा वापर बंद व्हावा. यासाठी पर्याय म्हणून मेलॉक्सिकॅम (meloxicam) नावाचे रसायन वापरले जाऊ शकते. याच बरोबर गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी केंद्रे स्थापन करण्यात येत आहेत. याची अम्मलबजावणी कशी होते यावर आता गिधाडांचे भवितव्य अवलंबून आहे.
एका रसायनामुळे एक अख्खी प्राणीजातच नष्ट होऊ शकते हे भीषण वास्तव आहे. या बाबतीत आपण त्याचा थेट संबंध लावू शकलो म्हणून त्यावर मार्ग सापडला. अशी किती रसायने आपण वापरतो आणि त्यामुळे कोणत्या प्राण्यावर काय काय परिणाम होत असतील कोणास ठाऊक. सध्या बीटी वांग या विषयावर चर्चा चालू आहे. अशा नवनवीन तंत्रज्ञानाचा कशावर कसा परिणाम होईल कोणास ठाऊक? नवीन तंत्रज्ञान कधी आणि कसे स्वीकारायचे हे आजच्या जगासमोरचे कठीण आव्हान आहे.
The Ridley’s Last Stand
ओरिसा मध्ये बंदर बांधण्याविरुद्ध इमेल पेटिशन कदाचित तुम्हाला आले असेल. मलाही आले होते. टाटांच्या या प्रकल्पामुळे रिडली कासवांना धोका आहे एवढेच माहिती होते. पण त्या कासवांची कहाणी कुठे माहित होती.
ओरिसा च्या सागर किना-यावर दर वर्षी एक चमत्कार घडतो. दूर श्रीलंकेच्या दक्षिण भागातून हजारोच्या संख्येनी रिडली कासवे हजरो कोलोमिटरचा प्रवास करत येतात. पाण्यामध्येच मेटिंग करून मादी जमीनीवर अंडी घालायला येते. अंडी घालून निघून जाते. काही दिवसांनी लाखो कासवे अंड्यातून बाहेर येतात आणि पाण्याच्या दिशेनी चालत जातात. मादी अंडी घालताना चे चित्रिकरण शेखर दत्तात्रे यांनी केले आहे. अंड्यातून बाहेर आल्यावर या लहान लहान कासवांच्या सागरात बसून या नैसर्गिक चमत्काराचेही चित्रीकरण फार सुंदर आहे. एक सागर दुस-या सागराला जाऊन भिडतो आहे असा भास होतो.
परंतु मासेमारीमुळे कासवांचे भवितव्य धोक्यात येत आहे. मोठ्या जाळ्याचा उपयोग केल्यामुळे त्यात कासवेही अडकतात व मरण पावतात. Turtle Excluder Device (TED) या उपकरणाचा उपयोग जाळ्यात केला तर कासवे यातून सुटू शकतात. कासवासोबत 5 टक्के माशांनाही सुटका मिळते. परंतु या 5 टक्के तोटाही सहन करण्याची कंत्राटदारांची तयारी नाही. या प्रश्नाचे इतरही पैलू आहेत. जसे की किना-यावार केलेली कॅशुरीना ची लागवड. किनार्‍याचा परिसर जर सपाट नसेल आणि त्यात छोटे आडथळे जरी असले तरी नुकत्याच जन्म झालेल्या कासवांना ते ओलांडून सागरापर्यंत पोहोचता येत नाही. जवळच्या परिसरात दिवे असतील तर पिल्ले दिव्याच्या दिशेनी जातात आणि पाण्यापर्यंत न पोहोचल्यामुळे मरून जातात.
हा प्रश्न सोडवण्यासाठी देखील अनेक नियम बनवले गेले आहेत. पण अम्मलबजावणीतच सगळं गाडं आडतं.
Shores of Silence – Whale Sharks in India
गुजरातच्या किनार्‍यावर व्हेल शार्क हा मासा वर्षातील काही काळ येतो. हा विशाल मासा 35 फूट लांबी पर्यंत वाढू शकतो. एवढा मोठा मासा पण छोटे छोटे प्लँक्टन मासे खाऊन जगतो. या माशाच्या लिव्हर पासून जे तेल मिळते त्याची बाजारात विक्री केली जाते. परदेशात हा मासा खाण्यातही वापरला जातो.
यात सर्वात क्लेशकारक असा प्रसंग म्हणजे या माशाची शिकार करण्याची पद्धत. यासाठी फारच साधी उपकरणे वापरली जातात. एक दोरी, एक आकडा (हुक) आणि दोन हवाबंद प्लॅस्टिक्ची पिंप. हे मासे वरच्या भागत असतात आणि सहज दिसतात. वरच्या थरातल्या गरम पाण्यात आणि उन्हात न्हात बसलेले असतात. मासा दिसला की आधी आकडी टोचतात. आकडीला दोरीनी दोन पिंप लावलेली असतात. आकडी लागताच मासा घाबरून खोल जातो. पण हवाबंद पिंप त्याला सतत वर खेचत राहतात. शेवटी थकून मासा वर येतो. मग त्याच्या शेपटीला दोरीनी बांधून किनार्‍यावर ओढून आणतात आणि मरेपर्यंत वाट बघतात.
हा लघुचित्रपट बनवण्यासाठी या प्रश्नाच्या विविध पैलूंचा माइक पांडे यांनी अभ्यास केला आहे. स्थानिक लोकांसोबत शिकारीला जाऊन, पॅट्रोल बोटीत कोस्ट गार्डच्या लोकांसोबत, मासा मारल्यानंतरची प्रक्रिया, लिव्हर पासून तेल बनवण्याची प्रक्रिया या सर्वाचे चित्रिकरण केले आहे.
2001 साली व्हेल शार्क च्या शिकारीवर बंदी आली. यामुळे रोजगार गमावलेल्यांना हेच व्हेल मासे दाखवून पर्यटनानून रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्न चालू आहेत असे नेट वरून समजले.
आयोजना बद्दल
फोलिएज च्या आयोजनही उत्तम होते. कार्यक्रम वेळेत सुरू झाला. मुळात अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करणे हीच एक उत्तम कल्पना आहे. पर्यावरणाबद्दल काम करत याची व्यवहारीक बाजू कशी सांभाळतात हे समजून घ्यावे लागेल. स्पर्धेतील चित्रपटांची सीडी बनवून ती कागदाच्या पिशवीत सर्वांना दिली. कार्यक्रमादरम्यान चहा कॉफी नव्हती :) त्यामुळेही भरपूर प्लॅस्टिक कप वाचले असतील. आपल्याला कधी उगीचच चहा कॉफी प्यायची सवय लागली आहे.
पडलेले प्रश्न
1. या सर्वच प्रश्नांच्या बाबतीत असे जाणवले की पर्यावराबद्दल जागृत असलेले लोक भरपूर प्रयत्न करून, सरकार वर दबाव आणून नियम बदलून घेतात. यात भरपूर वेळ, परिश्रम घ्यावा लागतो.  त्यानंतर जी सक्त अम्मलबजावणी करावी लागते त्यावर मात्र आपले काही नियंत्रण नाही. इतर सर्वत्र जाणवते ती कमजोर कडी इथेही जाणवते.
2. पर्यावरणाच्या प्रश्नांशी जेव्हा स्थानिक लोकांचे पोट अवलंबून असते तेव्हा काय करायचे? याला पर्याय शोधावाच लागतो आणि तो सापडतोच असे नाही.
3. आपल्या जीवशैलीचा पर्यावरणाच्या हानीशी आपण थेट संबंध लावू शकत नाही आणि म्हणून मला समजतही नाही की मी काय करू. जसे की व्हेल शार्क वाचवण्यासाठी मी काय करू? या प्रश्नांशी थेट संबंध लावता आले पाहिजे.  
या निमित्तानी Wild Life संबंधित डॉक्युमेंट्री हे नवीन विश्व उघडले. त्यात किती परिश्रम घ्यावे लागतात. माइक पांडे यांनी व्हेल्स वर 3 वर्ष डॉक्युमेंट्री बनवत होते. आणखीन म्हणजे खूप लोक या विषयी संवेदनशील आहेत. हे सगळे एकत्रित कसे आणायचे या दिशेनीही प्रयत्न केले पाहिजेत.   

-प्रियदर्शन

Wednesday, November 4, 2009

पडसाद

काल सायंकाळी मेधातांईना प्रत्यक्ष ऐकायला मिळालं. निमित्त होतं The Word’s First Anti-Dam Movement या प्राध्यापक वोरा लिखित पुस्तकावर फर्ग्युसन कॉलेजच्या राजशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या चर्चेचं. ‘धरण, धरणग्रस्तांचे प्रश्न आणि त्यासंदर्भातील चळवळी काही आपल्याला नवीन नाहीत’ कार्यक्रमाच्या सुरवातीला सुहास पळशीकर सांगत होते. जगामध्ये अशा प्रकारच्या चळवळी विविध स्तरावर चालू आहेत. पण जगात प्रथमचं अशा प्रकारच्या चळवळींची सुरुवात पुण्याच्या मुळशी धरणापासून सुरु झाली. त्यापूर्वी धरणग्रस्तांच्या तक्रारी होत्या पण धरणग्रस्तांनी संघटीतरीत्या आपली राजकीय भूमिका मांडणारा लढा प्रदीर्घ काळ लढल्याची नोंद इतिहासात नाही. हा मुळशीचा लढा लढला गेला होता १९२१ ते १९२४ च्या कालवधीत टाटा उद्योगसमूहाच्या विरुद्ध. त्याचं नेतृत्व केलं होतं सेनापती बापटांनी.

या लढ्याला गांधी समुदायाने फारसा पाठिंबा दिला नव्हता, परंतु गांधीजींनी मुळशी प्रकल्पाचं समर्थनसुद्धा केलं नव्हतं. लोक़ांच्या विरुद्ध भूमी संपादन करुन असे प्रकल्प उभे करणं याला गांधीजींचा विरोध होता.

मेधाताईंनी मुळशीचा लढा, नर्मदा बचावं आंदोलन, अशा जनाआंदोलनांच स्वरूप आणि त्यांचे परिणाम याची आपल्या भाषणातून अतिशय सुंदर मांडणी केली. मुळशीच्या आंदोलनाच्या माध्यमातून जरी मावळ प्रांतातले शेतकरी जरी टाटांना या प्रकल्पापासून परावृत करु शकले नसले तरी ते आंदोलन अयशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. “कोणतही जनाआंदोलन हे यशस्वी की अयशस्वी असं सरळ सरळ मोजता येत नाही.” मेधाताई सांगत होत्या. जनाआंदोलनातून समाजाला एक नवीन विचार मिळतो, तो व्यापक असतो आणि त्यातून राज्यसंस्थेची सुद्धा घडण होतं असते.

मुळशीच्या निमित्ताने काही मुद्दे समोर आले. राष्ट्रीय सुरक्षितता धोक्यात असताना किंवा राष्ट्रावर एखादी नैसर्गिक आपत्ती आली असताना राष्ट्र लोकांकडून कोणत्याही गोष्टींची मागणी करू शकते पण मुळशीच्या संदर्भात असं काहीचं नसताना सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या जमिनी कशाच्या आधारावर बळकवल्या जाऊ शकतात. शेती, शेतकरी आणि त्यावर आधारलेली अर्थव्यवस्था कि धरण, उद्योगधंद्यांना लागणारी वीज, त्यातून एका विशिष्ट वर्गाला होणारा फायदा यापैकी काय महत्वाचं आहे असे प्रश्न पहिल्यांदा उपस्थित केले गेले.

मुळशी नंतर सुरु झालेल्या आणि अगदी आतापर्यंतच्या नर्मदा बचाव आंदोलनापर्यंतच्या गेल्या काही वर्षातील चळवळींकडे पाहता, धरणग्रस्तांनी व त्यासंदर्भात काम करणार्‍या चळवळींनी फक्त आमच्या पुनर्वसनाचे काय? हा एकमेव प्रश्न उपस्थित केला नाही तर अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून धरणं खरीच “फायद्याची” ठरत आहेत का? धरणांमुळे दुष्काळाचा प्रश्न खरचं सुटतो का?. पर्यावरणाच्या दृष्टीने धरणांचं स्थान काय? इथून ते विकासाची खरी व्याख्या काय असावी? विकासाचं नवं ‘मॉडेल’ कसं असावं? विकास प्रक्रियेत लोकसहभाग किती व कसा असावा? सामाजिक संपात्तिचा वापर, पुनर्वापर व त्याच न्याय पद्धतीने समवाटप कस असावं? ते पैशाच्या बळावर वाढलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बेसुमार वापर करुन रुजू पाहणार्‍या उपभोग्तावादावर नियंत्रण असावे का? असे मूलभूत प्रश्न उपस्थित केले. या चळवळींनी यापैकी काही प्रश्नांवर अभ्यास केला आणि विकासाचे पर्यायी मार्गसुद्धा काही बाबतीत सुचवले. या पुस्तक चर्चेच्या निमित्ताने मेधाताईंनी या मुद्यांवर त्यांच्या ‘खास’ शैलीत विस्तृतपणे बोलल्या.

असं असतानादेखिल नंदीग्राम, सिंगुर, एसईझेड हे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आजही तितकेच तीव्रतेने आपल्यासमोर आहेत. माओवाद्यांचे प्रश्न जे अप्रत्यक्षपणे या प्रश्नांशी निगडीत आहेत. वेगवेगळ्या उद्देशांसाठी, वेगळ्या मार्गांनी होणार्‍या भूसंपादनातून निर्माण होणारे प्रश्न. हे प्रश्न आजही पुरेश्या सहृदयतेने हाताळले जात नाहीत. हे कदाचित उद्योजकांचे वाढते प्रस्थ, नोकरशाही आणि स्वार्थी राजकारणी यांमुळे घडत असावं. अशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेचा या प्रश्नांमध्ये सहभाग व त्यांची कृती अधिक महत्त्वाची आहे याची जाणीव झाली.

या महिन्याच्या सुरवातीला उल्का महाजन आणि सर्वहारा जनआंदोलनाची कामे पाहिल्यानंतर, गेल्या आठवड्याभरात बीटी वांग्याबद्दल झालेली चर्चा व त्याला विविध माध्यमातून व स्तरातून जनतेने केलेला विरोध बघितल्यानंतर जनाआंदोलनाचं महत्त्व पुन्हा एकदा माझ्या प्रत्ययास आलं.

खरं काय हे एकदा माहीत झाल्यानंतर आणि ते सरळ सरळ विवेकबुद्धिला पटत असताना देखिल काही विशिष्ट गटाच्या/ वर्गाच्या हितसंबधापोटी जर त्या गोष्टी प्रत्यक्षात येत नसतील तर अशावेळी सर्वसामांन्याची भूमिका महत्त्वाची ठरते. निवडणुकांव्यतिरीक्त ‘आम’ जनतेला विविध मुद्द्यांवर आपली मतं दखल घेतली जातील अशा पद्धतीने मांडण्यासाठी व व्यक्तिगत वा लहान गटांमधून कृती करता येईल अशी व्यासपीठं किंवा संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. त्याचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज आहे.

असं घडून आल्यानंतरच विवेक सावंत यांनी सांगितल्याप्रमाणे बदल घडून येण्याच्या प्रक्रियेतील ज्या Information, Interaction, Transaction आणि Transformation या चार पायर्‍या आहेत, त्यातील Interaction आणि Transaction या पायर्‍यांना गती मिळेल.


-सचिन

Monday, November 2, 2009

लहानपण देगा देवा


रात्री दहाच्या सुमारास अर्पिताला फोन केला. अनेक दिवसांनी तिच्याशी बोलत होतो. सहज बोलता बोलता जीवनाच्या निरर्थकतेविषया बोलणे चालू झाले. नुकतेच माझ्या आजीशी बोलत असताना मी तिला विचारलं की हे शरीर जर निरर्थक असेल, आत्मा जुन्या कपड्यांसारखा जर ते बदलत असेल तर मग लागतेच कशाला शरीर. आपण सर्व आत्मेच का नसतो? तेव्हा तिनी मला शंकराचा-यांची गोष्ट सांगितली. शंकराचार्य या भौतिक जगाला माया म्हणत. एकदा रस्त्यातून जात असता त्यांच्या मागे एक हत्ती लागला. तो जवळ आला अन् शंकराचार्यांनी धूम ठोकली. हे बघत असलेल्या त्यांच्या मित्रानी त्यांना बरोबर विचारले की हा हत्ती जर माया असेल तर मग तुम्ही का पळालात. तेव्हा शंकराचार्य म्हणाले, की हा हत्ती माया आहेच आणि मी पळालो ती देखील माया होती. अर्पिता आणि मी पाच एक मिनिटे फोन वर हसत होतो. कितीतरी दिवसांनी मी इतका हसलो.

आता झोपावे अशा विचारात होतो आणि जवळच्या मार्केटयार्ड मधल्या गणपती मंदिरातून भजनाचे स्वर आले. घरापासून या मंदिराचे हवेतील अंतर अंदाजे 500 मीटर असेल. मंदिराच्या वरच्या भागात 4 भोंगे लावले आहेत. तिथून थेट आवाज आमच्या सोसायटीत येतो. घरात जो आवाज येतो त्याचा त्रास होतो. हे गाणे अनेकदा बेसूर असते. शब्द तर समजत नाहीतच. तेव्हा रात्रीचे 10:30 वाजले होते. पहिल्यांदा 100 वर फोन केला. नेहमीप्रमाणेच गाडी पाठवतो असे उत्तर मिळाले. गाडी जाणार नाही हे अनुभवातून माहित होते. तरीही फोने केलाच पाहिजे, किमान त्याची नोंद तरी होते या विचाराने मी नेहमी 100 वर फोन करतो.

खाली उतरलो आणि माझी आत्या, शांति आत्या अपेक्षेप्रमाणे त्रस्त होतीच. तिल म्हटलो की आपण जऊन बघू. तिथे पोचल्यावर अपेक्षित चित्र दिसले. काही लोक मंदिरात भजन करत होते. त्या व्यतीरिक्त इतर कोणीही तिथे ऐकायला नव्हते. बाहेर काही लोकांशी बोलायला सुरुवात केली. बोलता बोलता नहेमीच येतात ते वाद प्रत्यवाद चालू झाले. मस्जिदीतून बांग येते ती मात्र तुम्हाला चालते. हिंदू धर्माचे मात्र चालत नाही. ते तुम्ही थांबवून दाखवा मग आमी हे थांबवतो. आता विचार करतो ते गांधींचे 'An eye for an eye makes the whole world blind' आठवते. अम्हाला मंदिरातूनच दोन लोकांचे नंबर मिळाले होते, त्यापैकी मोहोळ सर यांना फोन लावला. यांच्याशी मी आधीही बोललो आहे. मोहोळ सर हे आमचे नेहमी शांत पणे ऐकून घेतात. त्यांच्यावरच सगळा राग काढायला सुरुवात केली. ऐकतायत तर घ्या ओरडून. त्यांच्याशी बोलत असता समजले की त्यांच्या हातातही काही नाही. मग तो प्रयत्न सोडून दिला. बरेच वाद घालून झाल्यावर त्यांनी माइक काढला. भजन चालूच होते आणि भजन चालू असण्याबद्दल आमचा काहीच आक्षेप नव्हता. ते माइक लावून लाऊडस्पीकर वर प्रक्षेपित करण्याबद्दल आक्षेप होता. तरीही मी आणि आत्या समोरच्या पार-यांवर बसलो. मी आत्याला विचारले की त्यांनी माइक तर बंद केलाय आता आपण इथे का बसतोय. आत्या म्हणाली निषेध म्हणून. मग काही लोक म्हणाले की इथे     पाय-यांवर नका बसू, आत जावून बसा. मग आम्ही आत गेलो.

या सर्वात माझ्या हृदयाची गती वाढली होती. कशामुळे कुणासठावूक. इतक्या लोकांसमोर वाद घालण्याचा हा तसा पहिलाच अनुभव होता. मध्ये एकानी माझा हात धरून ढकलले ही होते. कदाचित भितीही वाटत असेल. तेवढ्यात कोणी येऊन चला चला भजन सुरू करा असे सांगितले. त्या भजन मंडळीला वाटले की मलाच गायचे आहे. मला फार मोह होत होता गायचा. विठ्ठलाचे भजन. मी आत्याकडे बघितले, ती म्हटली नाही गाता येत असे सांग. शांतपणे डोळे मिटळे, मांडी घातली आणि त्यांनी भजन सुरू केले.



लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥३॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥४॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥५॥



आत्मीयतेने आणि भक्तीभावाने गात होते. मनापासून. 

ऐकून शांत वाटायला लागले. हृदयाची गती परत स्थिरावली. घरी परतून आधी मोहोळ सरांना फोन लावला. घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. रागाच्या भरात काही उलट सुलट बोललो असेन तर क्षमा मागितली. त्यांनीही आम्हाला रोज त्रास होतो याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण त्यांचेही तिथे काही चालत नाही हे यावरून जाणवले.   दुस-याला समजून घेणे, जरा आवाज चढवला की ऐकून घेणे ही सज्जनाची लक्षणे त्यांच्यातही होती. आम्ही दोघेही एकाच बोटीत होतो.

दुस-या दिवशीही सकाळी 5:30 वाजता काकड आरती चालू झाली. सकाळी योगासन अभ्यासासाठी उठणे हे फार कठीण. पण उठल्या उठल्या या भजनांचे स्वर पडले की असे काही तरी वाटते की परत झोपच येत नाही. कधी विचार येतो की बरंच आहे. त्यानिमित्तानी रोज उठीन तरी. आणि योगासन वर्गात गेलो की सुटलो. आवाजही नाही आणि योगअभ्यासही होतो. दुहेरी लाभ. अडचणीचे रूपांतर संधीत. उठून 5.45 च्या सुमारास परत 100 वर फोन लावला. त्या व्यक्तीशी गप्पा मारल्या. की हा त्रास रोज होतो पण तुम्ही काहीच का करत नाही. त्यांनी सांगितले की पोलिस जाऊन येतात. थोडा वेळ आवाज बंद होतो पण मग परत सुरू होतो. अनेकदा वरून दबाव येतो. याची मला अपेक्षाच नव्हती. आता काय करणार?

काहीच सुचेना. येवून तंबोरा लावला आणि चादर डोक्यावर घेऊन परत झोपलो. योगासन वर्ग गेला खड्ड्यात.

आता हळू हळू समजते, मोठ्या माणसांमध्ये इतका निराशेचा सूर का असतो ते. बाबा नेहमी मला सांगतात, की कायदा कडक केल्याशिवाय  काहीच होणार नाही. डॉ राणी व अभय बंग यांच्या निर्माण उपक्रमात आम्ही विद्यार्थी आहोत. काही वेगळे करूयात, आपल्याभोवतालच्या परीस्थितीत काही चांगला बदल घडवण्यासाठी योगदान देत आपले आयुष्य जगूयात असे स्वप्न बघतो आहोत. आणि अशा लहानशाच प्रसंगातून परीस्थितीचे असे काही निराश विश्वरूप दर्शन घडते की काही समजेनासे होते. (विश्वरूप दर्शन वगैरे सगळे गीता थोडी थोडी वाचायला लागलोय म्हणून). क्षूद्रपणाची जाणीवच नाही तर सिद्धी होते, लहानपण मागावे लागत नाही.

अचानक, आधी वाचलेले गांधीजी थोडे थोडे समजत आहेत. अहिंसेचा स्वीकार करून इंग्रजांचा मारा सहन करणा-यांच्या जिद्दीचा अर्थ समजत आहे. अंधळ्या माणसाला रंग म्हणजे काय हे जसे समजू शकत नाही तसे या कल्पनांबद्दल मी आंधळाच होतो. 



दलाई लामा आणि तिबेट बद्दल कुंडुन नावाचा चित्रपट बघितला. त्यात तिबेट वर चीननी केलेक्या आक्रमणाचे वर्णन आहे. द्लाई लामांना तिबेट सोडून भारतात यावे लागले. 1959 सालापासून यांचा संघर्ष अहिंसक मार्गाने चालू आहे. कार्यरत पुस्तकात कर्नाटकातील चळवळीबद्दल लिहिले आहे. तिथे एका फॅक्टरीमुळे नदी आणि हवेचे प्रदूषण झालेले आहे. प्रत्येक श्वासागणिक लोकांना त्रास होतो आहे. इतर कितीतरी लोकांचे केवढे तरी तीव्र प्रश्न आहेत आणि आपण या छोट्याश्या त्रासाला का एवढे महत्त्व देतो. पण यावर एकच उत्तर सापडले आहे. की मोठा प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य काही आपल्यात नाही. जे आपल्या आवाक्यात आहे ते तरी करावे. 

सकाळी परत मंदिरात गेलो. मोहोळ सरांना भेटलो. सकाळपासून चाललेली आरती संपली होती व भोजन चालू होते. मोहोळ सर लोकांना वाढण्यात मग्न होते. गणेश घुले हे तिकडचे अध्यक्ष यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला. त्यांच्या म्हणण्यानुसार या मुळे धर्माचा प्रसार होतो. मला विचारले की धर्माच्या प्रसारासाठी मी काय करतो? मग त्यांनी त्यांच्या नेत्यांशी बोलायला सांगितले. प्रवीण चोरबेले. त्यांना समजवायचा प्रयत्न केला की आमचे घर लांब आहे तरीही तिथे थेट आवाज येतो. त्यांनी सांगितले, की तुम्ही दारे खिडक्या बंद करून बसा. कानात कापूस घालून बसा. आणि परत इथे येऊन त्रास देऊ नका. तुमच्या विरुद्ध पोलिस कम्पेंट करू. मग माझे नाव आणि फोन नं लिहून घेतला. मी ही त्यांचे नाव आणि फोन लिहून घेतला. आता काय करायचे याचा विचार चालू आहे. तुम्हाला काही सुचतेय?

-प्रियदर्शन